दिवस – २३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय । बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥४९॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥५०॥

अर्जुना, समत्व चित्ताचें । तेचि सार जाणें योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥७३॥ तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें, पार्था । दिसे हा अरुता । कर्मयोगु ॥७४॥ परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें, कर्म-शेष सहजें । योगस्थिति ॥७५॥ म्हणौनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनें करी अव्हेरु । फळहेतूचा ॥७६॥ जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभय-बंधी सांडिलें । पापपुण्यां ॥७७॥

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥

ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां ॥७८॥ मग, निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥७९॥

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥५२॥

तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥२८०॥ मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥८१॥ तेथ आणीक कांहीं जाणावें । कां, माघिलातें स्मरावें । हें, अर्जुना, आघवें । पारुषेल ॥८२॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥

इंद्रियांचिया संगति । जिये पसरु होतसे मति । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं॥८३॥ समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥८४॥

अर्जुन उवाच
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥५४॥

तेथ अर्जुन म्हणे “देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन; आतां सांगावा । कृपानिधी’ ॥८५॥ मग अच्युत म्हणे “सुखें । जें किरीटी, तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि’ ॥८६॥ या बोला पार्थें । म्हणितलें “सांग’ पां श्रीकृष्णातें । “काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें? । वोळखों केवीं?॥८७॥ आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥८८॥ तों कवणें स्थिती असे? । कैसेनि रूपें विलसे? । देवा, सांगावें हें ऐसें! । लक्ष्मीपती’ ॥८९॥ तंव, परब्रह्म-अवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो, काय तेथ, श्रीनारायणु । बोलतु असे ॥२९०॥

श्रीभगवानुवाच
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५॥

म्हणे “अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसीं । करितु असे ॥९१॥ जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु । परी विषयामाजी पतितु । जेणें संगें कीजे ॥९२॥ तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञ होये । पुरुष, जाणें’ ॥९३॥


निरहंकारता-उत्तम भक्त (७०० ते ७२१)

उत्तम भक्त कोणे लिंगेसीं । आवडते जाहले भगवंतासी । तें लक्षण सांगावयासी । अतिउल्हासी हरि बोले ॥७००॥

न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः । सज्जतेऽस्मिन्नहंभावो देहे वै स हरेः प्रियः ॥५१॥

प्राकृतां देहीं देहाभिमान । तेणें गुरुकृपा करितां भजन । पालटे अभिमानाचे चिन्ह । अहं नारायणभावनायुक्त ॥७०१॥ ‘अहं देह’ हे समूळ मिथ्या । ‘अहं नारायण’ हे सत्य तत्त्वतां । ऐशी भावना दृढ भावितां । ते भावनाआंतौता अभिमान विरे ॥२॥ अभिमान हरिचरणी लीन । तेव्हां भक्त होय निरभिमान । तेंचि निरहंतेचे लक्षण । हरि संपूर्ण सांगत ॥३॥ निरहंकाराची लक्षणे । तो जन्मोनि मी जन्मलों न म्हणे । सुवर्णाचें केलें शुनें । तरी सोने श्वान हों नेणे तदाकारे असतां ॥४॥ तेवीं जन्मादि अहंभावो । उत्तम भक्तां नाहीं पहा हो । कर्मक्रियेचा निर्वाहो । ‘अहंकर्ता’ स्वयमेवो मानीना ॥५॥ तो कर्म करी परी न म्हणे ‘मी कर्ता’ । जेवीं गगनीं असोनि सविता । अग्नि उपजवी सूर्यकांता । तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं ॥६॥ सूर्ये सूर्यकांती अग्निसंग । तेणें होतु याग का दाघ । तें बाधूं न शके सूर्याचे अंग । तेवीं हा चांग करूनि अकर्ता ॥७॥ अचेतन लोह चुंबकें चळे । लोहकर्मे चुंबक न मैळे । तेवीं हा कर्मे करूनि सकळे । अनहंकृतिबळें अकर्ता ॥८॥ देहींची कर्मे अदृष्टे होती । मी कर्ता म्हणतां ती बाधती । भक्तां सर्व कर्मी अनहंकृती । परमात्मप्रतीती भजनयोगें ॥९॥ एवं देहींची कर्मे निपजतां । पूर्णप्रतीती भक्त अकर्ता । कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथां अनहंकृती ॥७१०॥ जरी जाहला उत्तम वर्ण । तरी तो न म्हणे ‘मी ब्राह्मण’ । स्फटिक कुंकुमें दिसे रक्तवर्ण । ‘मी लोहीवा पूर्ण’ स्फटिक न म्हणे ॥११॥ ज्यासी नाहीं देहाभिमान । तो हातीं न धरी देहाचा वर्ण । तैसाचि आश्रमाभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा ॥१२॥ अंगी बाणला संन्यासु । परी तो न म्हणे ‘मी परमहंसु’ । जेवीं नटाअंगीं राजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥१३॥ तेवीं आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा । तैशीच जातीचीही कथा । न घे माथां भक्तोत्तम ॥१४॥ जाति उंच नीच असंख्य । परी तो न म्हणे हे माझीचि एक । जेवीं गंगातीरीं गांव अनेक । परी गंगा माझा एक गांव न म्हणे ॥१५॥ तेवीं जन्म-कर्म-वर्णाश्रम-जाती । पूर्ण भक्त हातीं न धरिती । चहूं देहांची अहंकृती । स्वप्नींही न धरिती हरिभक्त ॥१६॥ आशंका॥ तरी काय वर्णाश्रम-जाती । भक्त निःशेष सांडिती । त्यांत असोनि नाहीं अहंकृती । ते हे उपपत्ति बोलिलों राया ॥१७॥ तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती । तेव्हां त्यासवें नाहीं वर्णाश्रम-जाती । जन्मअभिमानें माथां घेती । हे कुळगोत-जाति पैं माझी॥१८॥ ऐशा नाथिल्या अहंकृती । ब्रह्मादिक गुंतले ठाती । वाढवितां वर्णाश्रम जाती । सज्ञान गुंतती निजाभिमानें ॥१९॥ ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती । ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती । सोडूं नेणे गा कल्पांतीं । सज्ञान ठकिजेती निजाभिमानें ॥७२०॥ येथे भक्तांच्या भाविक स्थितीं । अभिमान तुटे भगवद्भक्तीं । ते निरभिमान भक्तस्थिती । राया तुजप्रती दाविली स्वयें ॥२१॥

देव भक्ताचे रक्षण करतो (७२२ ते ७२७)

समूळ देहाभिमान झडे । तो देहीचि देवासी आवडे । ते भक्त जाण वाडेकोडें । लळेवाडे हरीचे ॥२२॥ ते जें जें मागती कौतुकें । तें देवोचि होय तितुकें । त्यांचेनि परम संतोखें । देव सुखावला सुखें दोंदिल होये ॥२३॥ तो जिकडे जिकडे जाये । देव निजांगें तेउता ठाये । भक्त जेउती वास पाहे । देव ते ते होय पदार्थ ॥२४॥ त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढे मागें । त्यासभोवता सर्वांगें । भक्तीचेनि पांगें भुलला चाले ॥२५॥ निरभिमानाचेनि नांवें । देव निजांगें करी आघवें । जेवीं कां तान्हयाचेनि जीवें । जीवें भावें निजजननी ॥२६॥ एवं राखतां निजभक्तांसी । तरी देव धाके निजमानसीं । जरी हा मजसी आला ऐक्यासी । तरी हे प्रीति कोणासी मग करावी ॥२७॥

अद्वैतभक्ती-उत्तमभक्ती (७२८ ते ७४२)

कोणासी पाहों कृपादृष्टी । कोणापें सांगों निजगोष्टी । कोणासी खेवें देवों मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥२८॥ या काकुळतीं श्रीअनंतु । ऐक्यभावें करी निजभक्तु । मग देवो भक्त दोहींआंतु । देवोचि नांदतु स्वानंदें ॥२९॥ एवं आपुली आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीतीं । हेंचि निरूपण वेदांतीं । ‘अद्वैतभक्ति’ या नांव ॥७३०॥ त्यांसी चहूं भुजी आलिंगितां । हांव न बाणेचि भगवंता । मग रिघोनियां आंतोता । परमार्थता आलिंगी ॥३१॥ ऐसें खेवाचें मीस करी । तेणें भक्त आणी आपणाभीतरीं । मग आपण त्याआंतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोंदाटे ॥३२॥ नवल आवडीचा निर्वाहो । झणीं यासी लागे काळाचा घावो । यालागी निजभक्तांचा देहो । देवाधिदेवो स्वयें होये ॥३३॥ ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजी उत्तमोत्तम । यापरी भागवतधर्म । पुरुषोत्तम वश्य करी ॥३४॥ ऐशिया उत्तम भक्ता । भेदाची समूळ नुरे वार्ता । हेचि अभेदभक्तकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥३५॥

न यस्य स्वः पर इति वित्तेष्वात्मनि वा भिदा । सर्वभूतसमः शान्तः स वै भागवतोत्तमः ॥५२॥

अद्वैतभजनाचे वोजें । मी माझें तूं आणि तुझें । ज्यांसी नुरेचि सहज निजें । तो भक्त मानिजे उत्तमत्वें ॥३६॥ यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं । भेदु निःशेष उरला नाहीं । तेथ माझें तुझें हें कांहीं । तें निमाले पाहीं जेथींच्या तेथें ॥३७॥ जेवीं अग्नीशी जें जें टेंके । तें तें अग्नीचि होऊनि ठाके । तेवीं अभेदभक्त जें जें देखे । तें तें यथासुखें स्वस्वरूप होये ॥३८॥ निजवित्त आणिकापाशी देतां । आवांकू नुपजे त्याचिया चित्ता । न देखे पारकेपणाची वार्ता । विकल्प घालितां तरी उपजेना ॥३९॥ डावे हातींचे पदार्था । उजवे हातीं स्वयें देतां । येथे कोण देता कोण घेता । तेवीं एकात्मता सर्वभूतीं ॥७४०॥ आपणासकट सर्व देहीं । भक्तां भगवंतावांचूनि नाहीं । यालागीं शांति त्याचे ठायीं । स्वानंदें पाहीं निःशंक नांदे ॥४१॥ ऐशिया निजसमशांतीं । भगवद्भक्त क्रीडा करिती । यालागी उत्तमत्वाची प्राप्ती । सुनिश्चिती पावले ॥४२॥

निरपेक्षता–उत्तम भक्त (७४३ ते ७६१)

हरिभक्तांची ‘निरपेक्षता’ । ऐक सांगेन नृपनाथा । उत्तम भक्तांची सांगतां कथा । अतिउल्हासता हरीसी ॥४३॥ निरपेक्ष तो मुख्य ‘भक्त’ । निरपेक्ष तो अति ‘विरक्त’ । निरपेक्ष तो ‘नित्यमुक्त’ । सत्य भगवंत निरपेक्षी ॥४४॥

त्रिभुवनविभवहेतवेऽप्यकुण्ठस्मृतिरजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् । न चलति भगवत्पदारविन्दाल्लवनिमिषार्धमपि यः स वैष्णवाग्र्यः ॥५३॥

सप्रेमभावें करितां भक्ती । हरिचरणी ठेविली चित्तवृत्ती । निजस्वार्थाचिये स्थितीं । अतिप्रीती निजनिष्ठा ॥४५॥ तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती । कर जोडूनि वरूं प्रार्थिती । तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी॥४६॥ क्षणार्ध चित्तवृत्ती काढितां । त्रिभुवनविभव ये हाता । एवढिया सांडूनि स्वार्था । म्हणाल हरिभक्तां लाभ कोण ॥४७॥ हरिचरणीं अपरोक्षस्थिती । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती । त्यापुढे त्रिभुवनविभवसंपत्ती । भक्त मानिती तृणप्राय ॥४८॥ सकळ जगाचा स्रजिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वतां । त्रैलोक्यराज्यसमर्थता । वोळगे वस्तुतां अंगणी ज्याचे ॥४९॥ त्रिभुवनवैभवाचे माथां । ब्रह्मपदाची समर्थता । तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिंवसिता हरिचरण ॥७५०॥ त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती । ब्रह्मा बैसोनि एकांतीं । अहर्निशी हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे ॥५१॥ सहसा न पवे हरिचरण । यालागी ब्रह्मा साभिमान । तेणें अभिमानेंचि जाण । नेली चोरून गोपाल-वत्सें ॥५२॥ तेथें न कष्टतां आपण । न मोडतां कृष्णपण । गोपाल-वत्से जाहला संपूर्ण । पूर्णत्वें पूर्ण स्वलीला ॥५३॥ अगाध हरिलीला पूर्ण । पाहतां वेडावलें ब्रह्मपण । तेव्हां सांडोनि पदाभिमान । अनन्यशरण हरिचरणीं ॥५४॥ कैलासराणा शूलपाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणीं । तोही निजराज्य सांडोनी । महाश्मशानी हरिचरण चिंती ॥५५॥ कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरीं । हरिचरण हृदयामाझारी । शिव निरंतरी चिंतीत ॥५६॥ एवं ब्रह्मा आणि शंकर । चरणांचे न पवती पार । तेथें त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमंदभाग्य ॥५७॥ हरिचरणक्षणार्धप्राप्ती । त्रैलोक्यराज्यसंपत्ती । भक्त ओंवाळूनि सांडिती । जाण निश्चितीं निबलोण ॥५८॥ हरिचरणसारामृतगोडी । क्षणार्ध जैं जोडे जोडी । तें त्रैलोक्य-वैभवाच्या कोडी । करी कुरवंडी निजभक्त भावें ॥५९॥ एवं हरिचरणांपरतें । सारामृत नाही येथे । यालागी चित्तें वित्तें जीवितें । जडले सुनिश्चितें चरणारविंदीं ॥७६०॥ निमिषार्ध त्रुटी लव क्षण । जे न सोडिती हरिचरण । ते वैष्णवांमाजी अग्रगण । राया ते जाण – ‘उत्तम भक्त’ ॥६१॥


३२०.बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्ये। संसारासि जीवें वेंटाळिलों ॥१॥ एकामध्ये एक नाही मिळों येत । ताक नवनीत निवडिलें ॥ध्रु॥ झाली दोनी नामें एकाचि मथनीं । दुसरिया गुणी वेगळालीं ॥३॥ तुका म्हणे दाखविली मुक्ताफळीं । शिंपलेंचि स्वस्थळी खुंटलिया ॥४॥
३२१.बरवा बरवा बरवा देवा तूं । जीवाहूनि आवडसी जीवा रे देवा तूं ॥ध्रु॥ पाहतां वदन संतुष्ट लोचन । झाले, आइकतां गुण श्रवण रे देवा! ॥२॥ अष्ट अंगें तनु त्रिविध ताप गेला शीण । वर्णितां लक्षण रे देवा! ॥३॥ मन झाले उन्मन अनुपम्य गहन। तुकयाबंधु म्हणे महिमा नेणे रे ॥४॥
३२२.सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडितो ठोमरा संतांलागी ॥१॥ गाईसी देखोनि बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥२॥ फुलें पाने वेश्येसी नेतसे उदंड । देऊं नेदी खांड ब्राह्मणांसी ॥३॥ बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितयांसी दवडुनी ॥४॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥५॥
३२३.सोलीव जें सुख अतिसुखाहुनी । उभे तें अंगणी वैष्णवांच्या ॥१॥ वृंदावन सडे चौक रंगमाळा । नाचे तो सोहळा देखोनियां ॥ध्रु॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥३॥ नामवोघ मुखीं अमृताचे सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥४॥ तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । न ये हे वासना त्याची करी ॥५॥
३२४.तीर्थे केली कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥ जळो त्याचे ज्यालेपण । न देखेचि समचरण ॥ध्रु॥ योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिलें ॥३॥ तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थें घडलीं पाहीं ॥४॥
३२५.कोणते कारण राहिलें यामुळे । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥ध्रु॥ नाहीं जात जीव होत नाही हानी । सहज तें मनीं आठवलें ॥२॥ नाहीं कांहीं चिंता मरत उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥३॥ हे तो तुज कळों येतसे अंतरीं । लापणीक वरी साच भाव ॥४॥ तुका म्हणे देवा, नाशिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥५॥
३२६.अाविसाचिये आशा गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥ मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥ अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा । तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥३॥
३२७.तुजवरी ज्याचे मन । दर्शन दें त्याचें ॥१॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ति ॥ध्रु॥ अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळा रोखिलें ॥३॥ तुका म्हणे तुज आड । लपोनि, कोड दावी देवा! ॥४॥
३२८.विश्वव्यापी माया । तिनें झांकुळिली छाया ॥१॥ सत्य गेलें भोळ्यावरी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु॥ आपुलेंचि मन । करी आपणा बंधन ॥३॥ तुका म्हणे देवा । तुम्ही कोडी ही उगवा॥४॥
३२९.पोटी जन्मती रोग । तरि कां म्हणावें आप्तवर्ग? ॥१॥ रानी वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी? ॥२॥ तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥३॥
३३०.नव्हे शब्द एकदेशी । सांडी गिवशी कोणाला ॥१॥ झाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु॥ मोक-लिलें जावें बाणें । भाता जेणें वाहिला ॥३॥ आतां येथें कैंचा तुका । बोले? शिक्का स्वामीचा ॥४॥
३३१.गायनाचे रंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥१॥ हें तो देणे तुमचे देवा! । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु॥ अंगी प्रेमाचे भरतें । नेघे उतार चढतें॥३॥ तुका म्हणे वाणी । प्रेम अमृताची खाणी ॥४॥
३३२.माप म्हणे ‘मी मवितें’। भरी धनी, ठेवी रिते ॥१॥ देवा, अभिमान नको । माझे ठायीं देऊ, सकों ॥ध्रु॥ देशी चाले सिक्का । रितें कोण लेखी रंका? ॥३॥ हातीं सूत्रदोरी। तुका म्हणे त्याची थोरी ॥४॥
३३३.कोण सांगायास । गेले होतें देशोदेश? ॥१॥ झालें वाऱ्या हाती माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु॥ कोणाची हे सत्ता । झाली? वाचा वदविता ॥३॥ तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥४॥
३३४.सकळांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥ अहो श्रोते वक्ते सकळही जन । बरें पारखून बांधा गांठी॥ध्रु॥ फोडिले भांडार धन्याचा हा माल । तेथे मी हमाल भारवाही ॥३॥ तुका म्हणे चाली झाली चहूं देशीं । उतरला कसी खरा माल ॥४॥
३३५.कोण त्याचा पार पाववे धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥ अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुति ‘नेती’ त्याही खुंटलिया ॥ध्रु॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥३॥ दाविले अनंतें अर्जुनासी पोटीं । आणीक त्या सृष्टि कृष्ण लोक ॥४॥ तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें? ॥५॥
३३६.जें जें कांहीं करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु॥ आम्ही दुजें नेणों कोणा । हेचि मना मन साक्ष ॥३॥ तुका म्हणे जगन्नाथा । हे अन्यथा नव्हे की ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top