
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – १. ओवी क्र. २४६ ते २७५
- सञ्जय उवाच
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. १०४ ते १४८
- भागवतधर्म-महिमा (११० ते ११७)
- नारदकृत वसुदेवस्तुती (११८ ते १२३)
- (नारदाचे) स्मरण-विस्मरण (१२४ ते १२८)
- (जीर्ण) भागवतधर्माचा इतिहास (१२९ ते २१४)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १५७ ते १७०
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – १. ओवी क्र. २४६ ते २७५
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: । स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्कर: ॥४१॥
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥४६॥ असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । तरी उजूचि; कां आडळिजे । जयापरी ॥४७॥ तैसा, कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय । मग आन कांहीं आहे । पापावांचुनि?॥४८॥ जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥४९॥ उत्तम अधमीं संचरती । ऐसें वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जाति-धर्म ॥२५०॥ जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥५१॥
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रिया: ॥४२॥
मग, कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका । जाणें आथी ॥५२॥ देखें, वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥५३॥ जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक कर्म पारुखे । तेथ, कवणा तिळोदकें । कवण अर्पी?॥५४॥ तरी पितर काय करिती! । कैसेनि स्वर्गीं वसती?। म्हणौनि, तेही येती । कुळापासीं ॥५५॥ जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आब्रह्म कुळ आघवें । आप्लविजे ॥५६॥
दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसङ्करकारकै:। उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता:॥४३॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन। नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् । यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता: ॥४५॥
देवा, अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे-संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥५७॥ जैसा, घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला । तो, आणिकांहीं, प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥५८॥ तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥५९॥ तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे ‘तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥२६०॥ पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उगंडु नाहीं । येसणें पतन कुळक्षयीं’ । अर्जुन म्हणे ॥६१॥ देवा, हें विविध, कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे?। अवधारीं पां ॥६२॥ अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं, तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही; दोख । अव्हेरू ना?॥६३॥ जे-हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां; काय थेंकुलें । घडलें आम्हां? ॥६४॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणय: । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥४६॥
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे-शस्त्रे सांडूनि साहावे । बाण यांचे ॥६५॥ तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी, येणें कल्मषें । चाड नाहीं ॥६६॥ ऐसें देखूनी सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे ‘राज्य तें केवळ । निरयभोगु’ ॥६७॥
सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुन: सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् । विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानस:॥४७॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्याय: ॥१॥
ऐसें तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे, अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥६८॥ मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥६९॥ जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां, रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥२७०॥ नातरी, महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु; भ्रमें । मग; आकळुनि कामें । दीनु कीजे ॥७१॥ तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दु:खे जर्जरु । दिसे; जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥७२॥ मग धनुष्य-बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसे, ऐके राया, वर्तलें । संजयो म्हणे ॥७३॥ आतां यापरी, तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥७४॥ ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥२७५॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोध्याय:॥१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. १०४ ते १४८
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
श्रीशुक उवाच- राजन्नेवं कृतप्रश्नो वसुदेवेन धीमता । प्रीतस्तमाह देवर्षिर्हरेः संस्मारितो गुणैः ॥१०॥
सांगतां वसुदेवाचा प्रश्न । श्रीशुक जाहला स्वानंदपूर्ण । नारदु वोळला चैतन्यघन । चित्सुखजीवन मुमुक्षां ॥४॥ श्रीशुक म्हणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा । ऐकोनि प्रश्नसुहावा । तो म्हणे ‘वसुदेवा धन्य वाणी’ ॥५॥ परिसतां हा तुझा प्रश्न । चित्सुखें प्रगटे नारायण । ऐसें बोलतां नारद जाण । स्वानंदें पूर्ण वोसंडला ॥६॥ रोमांच उचलले अंगीं । स्वेद दाटला सर्वांगीं । आनंदाश्रु चालिले वेगीं । स्वानंदरंगी डुल्लतु ॥७॥ सप्रेम मीनलिया श्रोता । जैं पूर्ण सुखावेना वक्ता । तैं तो जाणावा अवघा रिता- । कथासारामृता चवी नेणे ॥८॥ ऐकतां वसुदेवाचा प्रश्न । नारद सुखावे पूर्ण । मग स्वानंदगिरा गर्जोन । काय आपण बोलत ॥९॥
नारद उवाच – सम्यगेतद् व्यवसितं भवता सात्वतर्षभ । यत्पृच्छसे भागवतान् धर्मांस्त्वं विश्वभावनान् ॥११॥
भागवतधर्म-महिमा (११० ते ११७)
नारद म्हणे सात्वतश्रेष्ठा । वसुदेवा परमार्थनिष्ठा । धन्य धन्य तुझी उत्कंठा । तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥११०॥ ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हे विश्व अवघेचि उद्धरे । हे विचारिलें तुवां बरें । निजनिधीरें श्रीकृष्णजनका ॥११॥ तुझेनि प्रश्नोत्तरे जाण । साधक निस्तरती संपूर्ण । साधकांचे नवल कोण? । महापापी पावन येणें होती ॥१२॥
श्रुतोऽनुपठितो ध्यात आदृतो वाऽनुमोदितः । सद्यः पुनाति सद्धर्मो देवविश्वद्रुहोऽपि हि ॥१२॥
भागवतधर्माचेनि गुणें । एक उद्धरती श्रवणें । एक तरती पठणें । एक निस्तरती ध्याने संसारपाश ॥१३॥ एक श्रोतयां वक्तयांतें । देखोनि सुखावती निजचित्तें । सद्भावें भलें म्हणती त्यांतें । तेही तरती येथें भागवतधर्मे ॥१४॥ हे नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दुरात्मा । अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा । तोही तरे हा महिमा भागवतधर्मी ॥१५॥ हृदयीं धरितां भागवतधर्म । अकर्म्याचे निर्दळी कर्म । अधर्म्याचे निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥१६॥ जेथ रिघाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म । निंदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचें नाम उरों नेदी ॥१७॥
नारदकृत वसुदेवस्तुती (११८ ते १२३)
ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेनें केला प्रश्न तुवां थोर । निजभाग्ये तूं अति उदार । परम पवित्र वसुदेवा! ॥१८॥ तुझें वाणूं पवित्रपण । तरी पोटा आला श्रीकृष्ण । जयाचेनि नामें आम्ही जाण । परम पावन जगद्वंद्य ॥१९॥ तो स्वयें श्रीकृष्णनाथ । नित्य वसे तुझिया घरांत । तुझियाऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहतां ॥१२०॥ वसुदेवा तुझिया नामतां । ‘वासुदेव’ म्हणती अनंता । तें वासुदेव नाम स्मरतां । परमपावनता जगद्वंद्यां ॥२१॥
त्वया परमकल्याणः पुण्यश्रवणकीर्तनः । स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥१३॥
ज्याचेनि श्रवणे वाढे पुण्य । ज्याचेनि नामें झडे भवबंधन । तो सद्य स्मरविला तुवां नारायण । तुझी वाचा कल्याण वसुदेवा ॥२२॥ तुझा आजि ऐकतांचि प्रश्न । पूर्ण प्रगटला नारायण । मज तुझा हा उपकार पूर्ण । परम कल्याण वसुदेवा ॥२३॥
(नारदाचे) स्मरण-विस्मरण (१२४ ते १२८)
आशंका ॥ऐकोनि नारदाचे वचन । झणे विकल्प धरील मन । ‘यासी पूर्वी होतें विस्मरण । आतां जाहलें स्मरण वसुदेवप्रश्ने’ ॥२४॥ ज्यांची ऐसी विकल्पयुक्ती । तें जाणावे निजात्मघाती । तेही अर्थीची उपपत्ती । ऐक निश्चितीं शुक सांगे ॥२५॥ अग्नि कुंडामाजीं स्वयंभ असे । तो घृतावदानें अति प्रकाशे । तेवीं सप्रेम प्रश्नवशे । सुख उल्लासे मुक्तांचें ॥२६॥ सप्रेम भावार्थे मीनला श्रोता । मुक्तही उल्हासें सांगे कथा । तेथील सुखाची सुखस्वादुता । जाणे जाणता सवर्म ॥२७॥ यालागीं मुक्त मुमुक्षु विषयी जन । भागवतधर्मे निवती संपूर्ण । तोचि वसुदेवें केला प्रश्न । तेणें नारद पूर्ण सुखावला ॥२८॥
(जीर्ण) भागवतधर्माचा इतिहास (१२९ ते २१४)
जे कां पूर्वपरंपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ । सांगावया नारदमुनि निश्चित । उपपादित इतिहासु ॥२९॥
अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् । आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मनः ॥१४॥
येच अर्थी विदेहाचा प्रश्न । संवादती आर्षभ नवजण । ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास संपूर्ण सांगेन ऐक ॥१३०॥ ‘आर्षभ कोण’ म्हणसी मुळीं । त्यांची सांगेन वंशावळी । जन्म जयांचा सुकुळीं । नवांमाजी जाहली ब्रह्मनिष्ठा ॥३१॥
प्रियव्रतो नाम सुतो मनोः स्वायंभुवस्य यः । तस्याग्नीध्रस्ततो नाभिF©$षभस्तत्सुतः स्मृतः ॥१५॥
स्वायंभु मनूचा सुतु । जाण नामें ‘प्रियव्रतु’ । त्याचा ‘आग्नीध्र’ विख्यातु । ‘नाभी’ त्याचा सुतु सूर्यवंशी ॥३२॥ त्या नाभीपासूनि ज्ञानविलासु । ‘ऋषभ’ जन्मला वासुदेवांशु । मोक्षधर्माचा प्रकाशु । जगी सावकाशु विस्तारिला ॥३३॥
तमाहुर्वासुदेवांशं मोक्षधर्मविवक्षया । अवतीर्णं सुतशतं तस्यासीद्वेदपारगम् ॥१६॥
ऋषभ वासुदेवाचा अंशु । ये लोकीं मोक्षधर्मविश्वासु । प्रवर्तावया जगदीशु । हा अंशांशु अवतार ॥३४॥ त्याचे पंचमस्कंधी चरित्र । सांगितलें सविस्तर । त्यासी जाहले शत पुत्र । वेदशास्त्रसंपन्न ॥३५॥ त्यांहीमाजी ज्येष्ठ पुत्र । अतिशयें परम पवित्र । ऐक त्याचे चरित्र । अतिविचित्र सांगेन ॥३६॥
तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायणपरायणः । विख्यातं वर्षमेतद्यन्नाम्ना भारतमद्भुतम् ॥१७॥
जो ज्येष्ठपुत्र ‘भरत’ जाण । तो नारायणपरायण । अद्यापि ‘भरतवर्ष’ उच्चारण । त्याचेनि नांवें जाण विख्यात ॥३७॥ जो मनसा-वाचा-कर्मणा । अखंड भजे नारायणा । असतांही राज्यधर्मी जाणा । जो आत्मखुणा न चुके ॥३८॥ जेवीं मार्गी चालतां । पाउलें वक्रेही टाकितां । दैववशें अडखुळतां । आश्रयो तत्त्वतां भूमिकाचि ॥३९॥ तेवींचि तयासी असतां । राज्यधर्म चाळितां । यथोचित कर्म आचरतां । निजी निजात्मता पालटेना ॥१४॥ या नांव बोलिजे ‘अखंडस्थिती’ । जे पालटेना कल्पांतीं । जेथ असतां सुखी होती । पुनरावृत्ति असेना ॥४१॥ ऐसें करी सदाचरण । आणि नारायणपरायण । आईक त्याचेही व्याख्यान । विशद करून सांगेन ॥४२॥ नरांचा समुदाय गहन । त्यासी ‘नार’ म्हणती जाण । त्याचे ‘अयन’ म्हणजे स्थान । म्हणौनि म्हणती ‘नारायण’ आत्मयासी ॥४३॥ त्याच्या ठायीं परायण । म्हणिजे अनन्यत्वें शरण । निवटूनियां आपुलें अहंपण । तद्रूपें जाण राहिला ॥४४॥ ऐसा तो ऋषभाचा पुत्र । जयासी नांव ‘भरत’ । ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजीं ॥४५॥ तो भरतु राहिला ये भूमिकेसी । म्हणौनि ‘भारतवर्ष’ म्हणती यासी । सकळ कर्मारंभी करितां संकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताती ॥४६॥ ऐसा आत्माराम जऱ्ही झाला । तऱ्ही विषयसंग नव्हे भला । यालागी त्याचा वृत्तांतु पुढिला । सांगेन सकळां आइकें॥४७॥ नामें ख्याती केली उदंड । यालागीं त्याते म्हणती ‘भरतखंड’ । आणीकही प्रताप प्रचंड । त्याचा वितंड तो ऐका ॥४८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १५७ ते १७०
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥




राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.
शुभ सायःकाळ माऊली,जय जय रामकृष्णहरि माऊली,