दिवस – ३२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

श्लोक १७: यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥१७॥
ओव्या: देखें, असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥४६॥
जे, तो आत्मबोधें तोषला । तरी, कृतकृत्य देखें जाहला । म्हणौनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥४७॥
श्लोक १८: नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥१८॥
ओव्या: तृप्ति जालिया जैसी । साधनें सरती अपैसीं । देखें, आत्मतुष्टी तैसीं । कर्में नाहीं ॥४८॥
जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ॥४९॥
श्लोक १९: तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥१९॥
ओव्या: म्हणौनि तूं नियतु । सकळ कामनारहितु । होऊनियां; उचितु । स्वधर्में राहाटें ॥१५०॥
जें स्वधर्में निष्कामता । अनुसरले, पार्था । ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥५१॥
श्लोक २०: कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥२०॥
ओव्या: देख पां, जनकादिक । कर्मजात अशेष । न सांडितां, मोक्षसुख । पावते जाहले ॥५२॥
याकारणें, पार्था । होआवी कर्मी आस्था । हे आणीकही एका अर्था । उपकारैल ॥५३॥
जे-“आचरतां आपुणपां । देखौ लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि’ ॥५४॥
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥५५॥
मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥५६॥
हां गा, ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे? । तिहीं कवणें परी जाणिजे । मार्गातें या? ॥५७॥
श्लोक २१: यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥२१॥
ओव्या: एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥५८॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न सांडावें । विशेषें आचरावें । लागे, संतीं ॥५९॥
श्लोक २२: न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥२२॥
ओव्या: आतां आणीकांचीया गोष्टी । कायसा सांगो, किरीटी? । देखें, मीच इये राहाटी । वर्ततु असें ॥१६०॥
काय सांकडें कांहीं मातें? । कीं, कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥६१॥
तरी पुरतेपणालागी । आणीकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझ्या अंगी । जाणसी तूं ॥६२॥
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुंवां पवाडा देखिला । तोही मी; उगला । कर्मी वर्तें ॥६३॥
श्लोक २३: यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥२३॥
ओव्या: परी स्वधर्में वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाची एका उद्देशा- । लागोनियां ॥६४॥
जें, भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥६५॥
श्लोक २४: उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् । सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥२४॥
ओव्या: आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी । तरी प्रजा हे, कैसेनि । निस्तरेल?॥६६॥
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी । तें लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥६७॥
म्हणौनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥६८॥

सत्संग-असत्संग (३५१ ते ३५४)

ओव्या: मुख्य भागवतधर्मस्थिती । अवश्य करावी सत्संगती ।
हेचि सद्गुरु उपदेशिती । असत्संगतित्यागार्थ ॥५१॥
श्लोक २३: सर्वतो मनसोऽसङ्गमादौ सङ्गं च साधुषु । दयां मैत्रीं प्रश्रयं च भूतेष्वद्धा यथोचितम् ॥२३॥
(प्रथम विषयांचे ठिकाणी चित्ताची विरागस्थिती, सज्जनांचे ठिकाणी अनुराग, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार दया, मैत्री व नम्रता प्रत्यक्ष आचरणात आणावी. ॥२३॥)
ओव्या: सर्वांपासोनि निःसंग । जरी मनी होणे आहे चांग ।
तें अवश्य धरावा सत्संग । असत्संग त्यागावा ॥५२॥
मुख्य असत्संग देहसंगती । त्याची समूळ करावी निवृत्ती ।
जगी दाटुगी सत्संगती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥५३॥
जेथें दया मैत्री प्रश्रयो पूर्ण । मुख्यत्वे हे त्रिविध लक्षण ।
अवश्य करावे आपण । सत्संग प्रमाण स्वहितासी ॥५४॥

प्रश्रय (विनय) (३५५ ते ३५८)

ओव्या: सांडोनियां थोरपण । साधूसी लीन होआवें संपूर्ण ।
सांडोनियां देहाभिमान । त्यासी लोटांगण घालावें ॥५५॥
साधूपरता पूज्य पहा हो । जगीं नाहीं आन देवो ।
संतपूजनें देवाधिदेवो । स्वयमेवो संतुष्टे ॥५६॥
संतपदींचे रजःकण । शिरीं वंदावे श्रद्धेनें पूर्ण ।
संतांपुढे जाणपण । सर्वथा आपण न मिरवावें ॥५७॥
देखोनि संतसमुदावो । अनन्यगती भगवद्भावो ।
भगवद्भावें नम्र स्वभावो । ‘प्रश्रयो’ पहा हो या नांव ॥५८॥

दया (३५९ ते ३६५)

ओव्या: नम्रता सेवितां संतचरण । येथे भूतदया वाढे पूर्ण ।
हे दयेचें निजलक्षण । सावधान अवधारीं ॥५९॥
भूतांसी कठिणपण । देखतां निघों पाहे प्राण ।
मा स्वयें करील आपण । हे सर्वथा जाण स्वप्नीं न घडे ॥३६०॥
जेणे आपणासी होय दुःख । तें भूतांसी करीना निःशेख ।
जेणे आपणासी होय सुख । तें आवश्यक करी दीना ॥६१॥
सर्व भूती दया समान । कदा न बोले कठिणपण ।
भूतांची पीडा निवारण । करोनि आपण सुखोपाय चिंती ॥६२॥
जीवमात्रीं दुरुक्ती बोलतां । जिव्हेच्या घेवों पाहे जीविता ।
भूती दुष्टपण चाळितां । समूळ निजचित्ता निर्दाळू पाहे ॥६३॥
भूतांसी जेथ पीडा पावे । त्यातळी जीव घालूं धांवे ।
जीवापरीस भूतें सर्वें । दयागौरवें पढियंतीं ॥६४॥
ऐसे जें कारुण्य पूर्ण । त्या नांव ‘दया’ संपूर्ण ।
आतां मैत्रीचे लक्षण । असाधारण तें ऐका ॥६५॥

मैत्री (३६६ ते ३६८)

ओव्या: सर्व भूतांचे ठायीं । सुहृदावांचोनि दुजें नाहीं ।
तरी न करितांचि मैत्री पाहीं । ठायींचे ठायीं अलोलिक॥६६॥
जे विषयवियोगें न विटे । नाना विकल्पी न तुटे ।
आलिया परम संकटें । ‘मैत्री’ नेटेपाटें सदा ग्राह्य ॥६७॥
या नांव गा मित्रभावो । प्राण गेलिया न तुटे पहा हो ।
देखतां कल्पांतकाळघावो । निजमित्रसमुदावो एकवटे की ॥६८॥

भाव (श्रद्धा) (३६९ ते ३७७)

ओव्या: ऐसी आचरतां निजस्थिती । श्रद्धा उपजे सर्वां भूतीं ।
त्या श्रद्धेची व्युत्पत्ती । यथानिगुती सांगेन ॥६९॥
नवल श्रद्धेचे लक्षण । ब्रह्मा मुंगी समसमान ।
तरी यथोचित विधान । सर्वथा जाण चुकेना ॥३७०॥
अर्घ्यपाद्यादि पूजन । सकळ दान आणि सन्मान ।
हे श्रद्धा ब्राह्मणी संपूर्ण । एकासी तें जाण अन्नमात्रचि ॥७१॥
एका अन्न आच्छादन । एकासी ते कोरडे कण ।
तृण आणि जीवन । एका पयःपान यथोचित ॥७२॥
जेणें ज्यासी सुख संपूर्ण । तें तें करी उचित श्रद्धे जाण ।
अनुचित श्रद्धेचें विंदाण । दुःखकारी संपूर्ण सर्वार्थीं ॥७३॥
जेवीं ब्राह्मणा वाढिलें तृण । गाईस वाढिलें मिष्टान्न ।
श्वानासी बैसणे सिंहासन । साधूसी आसन थारोळा ॥७४॥
व्याघ्रासी पडिल्या लंघन । त्यासी अर्पू नये गोदान ।
गाय गादल्या संपूर्ण । तैलाभ्यंजन करूं नये ॥७५॥
हो कां देह-इंद्रिये जरी एकें । तरी जिव्हाकर्म नव्हे नाकें ।
तेवीं एक भूतात्मा भूतवेखें । उचितोन्मुखें यजावा ॥७६॥
करितां यथोचित अर्पण । जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न ।
तरी अंतरश्रद्धा अभिन्न । हे मुख्य लक्षण भागवतधर्मी ॥७७॥

शुचिता (३७८ ते ३९९)

ओव्या: भूतीं भूतात्मा अभिन्नस्थिती । दया मैत्री साधूंची भक्ती ।
हेच आतुडे कैशा रीतीं । प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे ॥७८॥
तेचि नव श्लोकी श्लोकोक्ती । समूळ भागवतधर्मस्थिती ।
प्रबुद्ध सांगे रायाप्रती । साधकां निजप्राप्ती साधावया ॥७९॥
श्लोक २४: शौचं तपस्तितिक्षां च मौनं स्वाध्यायमार्जवम् । ब्रह्मचर्यमहिंसां च समत्वं द्वन्द्वसंज्ञयोः ॥२४॥
(अर्थ – देहमनाची शुद्धी, वर्णाश्रमाचा उचित आचार, चरफडल्यावाचून सहन करणे, वायफळ न बोलणे, शास्त्राध्ययन, मनाचा सरळपणा, इंद्रियनिग्रह, काया-वाचा-मनाने दुसऱ्यास पीडा न देणे, आणि (सुखदु:खादी)द्वंद्वाविषयी समबुद्धी.)
ओव्या: मुख्य साधावया परमार्था । अवश्य पाहिजे गा ‘शुचिता’ ।
शुचित्वावांचोनि तत्त्वता । न लाभे हाता निजस्वार्थु ॥३८०॥
यालागीं गा नृपनाथा । शुद्ध शौचाची आइक कथा ।
आंतर मळ न क्षाळितां । न लाभे हाता बाह्यशुद्धी ॥८१॥
मन मळिण वासनामळे । तें न करितां सोंवळे ।
बाह्य पवित्रता अहंबळें । तें जाण आंधळे न्याहाळी जैसें ॥८२॥
मन मळिण वासनामळे । तें प्रक्षाळूनि सोविळे ।
करावें गा भावबळें । गुरुवाक्यमेळे निजनिष्ठा ॥८३॥
सोने जेवीं पुटीं पडे । मळ तुटे वाणी चढे ।
तेवीं गुरुसेवा जडत्व मोडे । चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट ॥८४॥
आरशासी सहाणी तोडिजे । तेणें स्वमुखा शुद्धत्व जोडिजे ।
तेवीं चित्तशुद्धी उघडिजे । सहजीं सहजें निजशुद्धी ॥८५॥
लोहें परिसु झांकिजे । तंव लोहत्वा मुकिजे ।
तेवीं अंतरशुद्धीने कीजे । महा निर्बुजे स्थूळबुद्धि ॥८६॥
सूर्यासन्मुख सूर्यकांत । जाहलिया शुद्धत्वें होय दीप्त ।
ते प्रभा बाह्य प्रकाशत । अग्निहोत्रार्थ महायागा ॥८७॥
तेवीं गुरुवाक्ये अंतरशुद्धता । सबाह्य आली शुचिता ।
हे न करिती जे पवित्रता । ते जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥८८॥
अल्प जळ शौचाप्रती । तेणें हात करकटले ठाती ।
शेवटीं गिरबडे बृहती । तेवीं विकल्पी होती अपवित्र ॥८९॥
भरलें काळकूट जीवीं । वरी टवटव अतिबरवी ।
तें इंद्रावण कोणीही न सेवी । अंतरस्वभावी अतिमळिण ॥३९०॥
तीर्थी धुतला रजकराजु । तो काय होईल शुद्ध द्विजु ।
नटें घेतला राजध्वजु । तो नव्हे पूज्यु बाह्यक्रियावशें ॥९१॥
सुंदरी सुकुमार साजिरी । वोठी कुष्ठता तिळभरी ।
जाहलिया तीते कोणी न वरी । वरीवरी बरी दिसताही ॥९२॥
नागवी माथां मोत्यांची जाळी । शिंबरी सुपाणीदाणा ल्याली ।
तेवीं बाह्य पवित्रता दाविली । ते ते केली निजभंडिमा ॥९३॥
दहें माखला वायसु । तो काय होईल राजहंसु ।
दही म्हणोनि मथितां कापुसु । तृप्ती नव्हे उपहासु जगीं प्रगटे ॥९४॥
तेवीं अंतरीं विकल्पु असतां । बाह्य जे जे पवित्रता ।
ते ते क्रिया नृपनाथा । जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥९५॥
अंतर क्षाळिलें गुरुप्रतीती । बाह्य क्षाळिलें शास्त्रयुक्तीं ।
ऐसें शुचित्व निजनिश्चितीं । अद्वैत स्थिती तेथे नांदे ॥९६॥
अंतरीं शुचित्व पूर्ण वसे । तें बाह्यकर्मीं स्वयें प्रकाशे ।
तें शुचित्वचि अनायासें । परमार्थदशे प्रकाशी ॥९७॥
ईश्वरभावाचे निजवर्म । ज्याचे पोटी रिघालें सप्रेम ।
त्याचे कर्मचि होय ब्रह्म । त्या देहभ्रम बाधीना ॥९८॥
या नाम ‘शुचिष्मता’ । सत्य जाण गा नृपनाथा ।
तपाचीही स्थिती आतां । ऐक तत्त्वतां सांगेन ॥९९॥

४८८.देऊ ते उपमा । आवडीने पुरुषोत्तमा! ॥१॥
पाहातां, ‘काशा तूं सारिखा । तिहीं लोकांच्या जनका’ ॥ध्रु॥
आरुष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥३॥
आवडीने खेळे । तुका पुरवावे सोहळे ॥४॥
४८९.दर्शनाची आस। आतां न साहे, उदास ॥१॥
जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेसीं ॥ध्रु॥
कांहींच नाठवें । ठायीं बैसले नुठवें ॥३॥
जीव असतां पायीं । तुका ठकावला ठायीं ॥४॥
४९०.भोगावरी आम्ही घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥
विश्व तूं व्यापक काय मी निराळा? । काशासाठी बळा येऊं आतां? ॥ध्रु॥
काय सारोनियां काढावे बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं?॥३॥
केला तरि उरे वादच कोरडा । बळे घ्यावी पीडा स्वप्नींची ते? ॥४॥
अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोजकीर्दी ॥५॥
तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥६॥
४९१.कां हो येथे काळ आला आम्हां आड? । तुम्हां-पाशीं नाड करावया ॥१॥
कां हो विचाराचे पडिलें सांकडें । काय ऐसे कोडें उपजलें? ॥ध्रु॥
कां हो उपजेना द्यावी ऐसी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा! ॥३॥
पाप फार किंवा झालासी दुर्बळ । मागिल ते बळ नाहीं आतां? ॥४॥
काय झालें देणें, निघालें दिवाळें । की बांधलासि बळें ऋणेपायीं? ॥५॥
तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी? । तुझी माझी ठेवी निवडुनी ॥६॥
४९२.काय देह घालूं करवती कर्मरी । टाकू या भितरी अग्नीमाजी? ॥१॥
काय सेवूं वन शीत उष्ण तहान । साहों की मोहन धरूनि बैसों? ॥ध्रु॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी? ॥३॥
काय त्यजूं अन्न करूं मी उपवास । काय करूं नास जीवित्वाचा? ॥४॥
तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देईं भाव पांडुरंगा! ॥५॥
४९३.दंभे कीर्ति, पोट भरे, मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु॥
पिंडाच्या पाळणें धांवतीं विकार । आहे दावेदार मजमाजीं ॥३॥
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥४॥
तुका म्हणे मज दावीं तो सोहळा । देखें पाय डोळां तुझे देवा! ॥५॥
४९४.धिग जिणे ज्याचा स्वामी हीनवर । मरण तें बरें भले मग ॥१॥
आइकाजी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु॥
देशोदेशी धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥३॥
तुका म्हणे हे कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥४॥
४९५.आतां गाऊं तुज ओवीया मंगळी । करूं गदारोळी हरिकथा ॥१॥
होसी निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु॥
भोगिले ते भोग लावूं तुझें अंगीं । अलिप्त या जगी होऊनि राहों ॥३॥
तुका म्हणे आम्ही लाडिकीं लेकरें । न राहों अंतरें पायांविण ॥४॥
४९६.सर्वसुखें आजी येथेंचि वोळलीं । संतांची देखिलीं चरणांबुजें ॥१॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळे ॥ध्रु॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढे झाले चित्त समाधान ॥३॥
४९७.विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती। विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥
विठ्ठले हे अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥
सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तेंही करी ध्यान विठोबाचें ॥४॥
तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥
४९८.होय होय वारकरी । पाहें पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावी साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥३॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥४॥
४९९.पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु॥
न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥३॥
तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥४॥
५००.बळें बाह्यात्कारें संपादिले सोंग । नाहीं झाला त्याग अंतरींचा ॥१॥
ऐसें येते नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरूनि सकळही ॥३॥
प्रपंचाबाहेरी नाही आले चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥४॥
तुका म्हणे मज बहुरूप्याची परी । झाले सोंग वरी आंत तैसें ॥५॥
५०१.म्हणवितों ‘दास’ ते नाही करणी। आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥
गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु॥
पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥३॥
भांडवल काळे हातोहाती नेलें । माप या लागले आयुष्यासी ॥४॥
तुका म्हणे ‘वायां गेलों’ ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें॥५॥
५०२.न कळे तो काय करावा उपाव । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥१॥
येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कईं कासयानें ॥ध्रु॥
साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हे करिसी कैं गा देवा! ॥३॥
लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरी येऊनि राहें ॥४॥
तुका म्हणे मज राखावें पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा! ॥५॥
५०३.चिंतिलें तें मनिचें जाणे । पुरवी खुणे अंतरींचे ॥१॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगी खेळे दैवत हे ॥ध्रु॥
नवसियाचे पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥३॥
तुका म्हणे समचि देणें । समचरणीं उभा असे ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top