दिवस – ४७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः । एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥४॥
एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्य-योग-संस्था । जाणती केवीं? ॥२६॥
सहजें ते अज्ञान । म्हणौनि म्हणती “ते भिन्न’ । एऱ्हवीं, दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती? ॥२७॥
पें सम्यक् येणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें । तें दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥२८॥
यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते । एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥५॥
आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणौनि, ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥२९॥
देखें, आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसें ऐक्य योग-संन्यासा । वोळखे जो ॥३०॥
तयासिचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्य, योग जाणवलें । भेदेंविणु ॥३१॥
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः । योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥६॥
जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥३२॥
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासें पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥३३॥
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः । सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥७॥
जेणें भ्रांतीपासोनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ॥३४॥
जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें, अल्प, आवडे । मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥३५॥
तैसें संकल्पाौनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें; परी व्यापिलें । लोकत्रय ॥३६॥
आतां कर्ता-कर्म-करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी, जऱ्ही आघवें । तऱ्ही, अकर्ता तो! ॥३७॥
नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥८॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥९॥
जे, पार्था, तया देहीं । मी; ऐसा आठवू नाहीं । तरी कर्तृत्व कैंचें काई । उरे सांगें? ॥३८॥
ऐसें तनुत्यागेंविणु । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥३९॥
एऱ्हवीं, आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥४०॥
तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परि, तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें! ॥४१॥
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥४२॥
आहारातें स्वीकारी । त्यजावें, तें परिहरी । निद्रेचिया अवसरीं । निदैजे सुखें ॥४३॥
आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें । राहाटे कीर ॥४४॥
हें सांगों काई एकैक! । देखें, श्वासोच्छ्वासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥४५॥
पार्था, तयाच्या ठायीं । हें आघवेंचि आथी; पाहीं । परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥४६॥
जें भ्रांति सेजे सुतला । तें स्वप्नसुखें भुतला । मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनिया ॥४७॥
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥१०॥
आतां अधिष्ठान-संगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥४८॥
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसें । देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥४९॥
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥५०॥

ओमित्यादेशमादाय नत्वा तं सुरवन्दिनः । उर्वशीमप्सरः श्रेष्ठां पुरस्कृत्य दिवं ययुः ॥१५॥
इन्द्रायानम्य सदसि श्रृण्वतां त्रिदिवौकसाम् । ऊचुर्नारायणबलं शक्रस्तत्रास विस्मितः ॥१६॥
(अर्थ – नारायणाच्या आज्ञेला मस्तकी धारण करून देवसेवकांनी ॐ म्हणून (ॐ शब्दाने नारायणाचे महत्त्व लक्षात घेऊन) नमस्कार केला आणि अप्सरांमध्ये श्रेष्ठ अशा उर्वशीला घेऊन ते स्वर्गाला निघून गेले. ॥१५॥ त्यांनी इंद्राला नमस्कार करून, इंद्रसभेत सर्व देव श्रवण करीत असतानाच, नारायणाचा प्रभाव वर्णन केला. ते ऐकून इंद्राला तेथे अत्यंत आश्चर्य वाटले. ॥१६ ॥)
ऐकोनि नारायणवचन । मस्तकांबुजी करूनियां नमन । उर्वशी पुढां सून । कामादि गण निघाले वेगीं ॥९४॥
नारायणाचे ऊरुस्पर्शी । उभी होती नारायणापाशीं । तेंचि नांव झालें तिसी । म्हणती ‘उर्वशी’ स्वर्गांगना ॥९५॥
ते देवांचे देवदूत । स्वर्गा पावले समस्त । मग शक्राचे सभेआंत । सांगती अद्भुत नारायणशक्ति ॥९६॥
तिहीं नारायणाचें चरित्र । सांगितलें अतिपवित्र । तेणे अवघेचि सुरवर । झाले थोर विस्मित पैं ॥९७॥
इंद्रे देखोनि उर्वशी । तिसी भुलला अहर्निशीं । बाहेर यावें सभेसी । हे वर्षानुवर्षी नाठवे ॥९८॥
हे प्रथमावतारवार्ता । जे कां नारायणाची कथा । पुढील अवतार आतां । नृपनाथा अवधारीं ॥९९॥

विघ्ने आणि भक्ती (२०० ते २०७)

ऐक राया अतिअपूर्व । छळवादियां पूजा सर्व । करून दाखवी स्वयमेव । ‘पूर्णानुभव’ या नांव ॥२००॥
आशंका ।। भावें करितां भगवद्भजन । यापरी इंद्र करी विघ्न । नारायण चैतन्यघन । तेणें विघ्ने संपूर्ण पराभविलीं ॥१॥
मा बाळ्याभोळ्यां करितां भक्ति । ऐशी विघ्ने जैं छळू येती । तैं कदा नव्हे भगवत्प्राप्ति । ऐसा विकल्प चित्तीं झणीं धरिशी ॥२॥
ब्रह्मादिकां सर्व भूतां । भृकुटिमात्रे जो नियंता । त्या भगवंतातें भजतां । विघ्ने सर्वथा बाधूं न शकती ॥३॥
ज्याचेनि इंद्रा इंद्रपण । तो भावें भजतां श्रीनारायण । भक्तांसी विघ्न करी कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥४॥
इंद्रमुख कामादिक । विघ्ने छळिती सकळ लोक । त्यांचाही नारायण चाळक । तो भक्तांसी देख स्पर्शों नेदी ॥५॥
विघ्नांसी भुलविलें जेणें संपूर्ण । तो नित्य स्मरतां नारायण । आपधाकें विघ्ने पळती जाण । भक्तसंरक्षण हरिनामें ॥६॥
करावया निजभक्तकैवार । देवो धरी नानावतार । त्याच्या अवतारांचे चरित्र । अतिविचित्र अवधारीं ॥७॥

अवतारवर्णन-प्रारंभ

हंसस्वरूप्यवददच्युत आत्मयोगं दत्तः कुमार ऋषभो भगवान् पिता नः । विष्णुः शिवाय जगतां कलयाऽवतीर्णस्तेनाहृता मधुभिदा श्रुतयो हयास्ये ॥१७॥
(अर्थ – (द्रुमिल ऋषी राजाला आणखी अवतार सांगतात.) त्रिभुवनाच्या कल्याणाकरिता, आपल्या स्वरूपाहून कधीही च्युत न होणाऱ्या विष्णूने आपल्या अंशाने हंस, दत्त, सनत्कुमार, आमचा पिता ऋषभदेव असे अवतार धरून आत्मज्ञानाचा बोध केला. मधुदैत्याने चोरलेले वेद, हयग्रीव अवतार घेऊन, त्याने पुन: उपलब्ध करून दिले.॥१७॥)
हंसावतार (२०८)
सनकादिक ब्रह्मनंदन । तिहीं पित्यासी केला प्रश्न । प्रश्नखंडणमिसें जाण । केलें ब्रह्मज्ञान ‘हंसावतारें’ ॥८॥
दत्तावतार (२०९, २१०)
नित्य स्मरतां हरीचें नाम । महाविघ्नें होती भस्म । त्याचे अवतारसंभ्रम । उत्तमोत्तम अवधारी ॥९॥
ज्याचेनि नामें पळे कृतांतु । ज्याचेनि नामें जन्ममरणां घातु । तो अवतारु ‘श्रीदत्तु’ । मूर्तिमंतु परब्रह्म ॥२१० ॥
सनत्कुमारावतार (२११)
नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति । यालागीं ‘कुमार’ म्हणती । अवतारमूर्ति सनकादिक ॥११॥
ऋषभावतार (२१२, २१३)
आणि आमुचा जो कां पिता । ‘ऋषभ’ नारायण ज्ञाता । तोही अवतार नृपनाथा । जाण तत्त्वतां भगवन्मूर्ति ॥१२॥
इहीं नामी-रूपी संपूर्ण । अवतारी अवतरे नारायण । जो जगाचा प्रतिपाळण । स्वांशें श्रीकृष्ण अवतरे ॥१३॥
हयग्रीवावतार (२१४, २१५)
तोचि स्वयें गा श्रीकृष्ण । मधुकैटभ निर्दाळून । नामें जो कां ‘मधुसूदन’ । तोचि अवतरून ‘हयग्रीव’ झाला ॥१४॥
तेणें शंख मर्दून पुढती । उद्धरिल्या बुडाल्या श्रुती । आणोनि दिधल्या ब्रह्मयाहातीं । जाण निश्चितीं वेदरक्षणा ॥१५॥
गुप्तोऽप्यये मनुरिलौषधयश्च मात्स्ये क्रौडे हतो दितिज उद्धरताऽम्भसः क्ष्माम् । कौर्मे धृतोऽद्रिरमृतोन्मथने स्वपृष्ठे ग्राहात्प्रपन्नमिभराजममुञ्चदार्तम् ॥१८॥
(अर्थ – प्रलयाचे वेळी स्वायंभुव मनू , पृथ्वी व औषधी यांचे, मत्स्य अवतार घेऊन रक्षण केले. वराह अवतारात, बुडणारी पृथ्वी वर काढली व (हिरण्याक्ष) दैत्याला मारले. कूर्मावतारी समुद्रमंथनप्रसंगी मंदरपर्वताला पाठीचा आधार दिला. त्याचप्रमाणे शरण आलेल्या गजेंद्राला ‘हरी’ नावाचा अवतार घेऊन मगरमिठीतून सोडविले. ॥१८॥)
मत्स्यावतार (२१६)
तेणेंचि ‘मत्स्यावतारें’। प्रलयकालांबुमहाभारें । मनूसगट रक्षिलें धरे । निजनिर्धारें औषधींसीं ॥१६॥
कमठावतार (२१७)
तेणेंचि ‘कमठावतारा’। स्वपृष्ठीं धरूनि गिरिवरा । मंथोनियां क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिलें ॥१७॥
श्वेतवाराहावतार (२१८)
श्वेतवराह महामूर्ति । धरेनें केली पूर्ण भक्ति । तिसी उद्धरोनि कृपामूर्ति । अभिनव शांति अर्पिली ॥१८॥
गजेंद्रमोक्षावतार (२१९)
तेणें आर्तत्राणा तांतडी । वैकुंठींहून घालोनि उडी । ‘गजाचे ग्राहबंधन तोडी’। उद्धरिलें आवडी गजेंद्रातें ॥१९॥
संस्तुन्वतोऽब्धिपतिताञ्छ्रमणानृषींश्च शक्रं च वृत्रवधतस्तमसि प्रविष्टम् । देवस्त्रियोऽसुरगृहे पिहिता अनाथा जघ्नेऽसुरेन्द्रमभयाय सतां नृसिंहे ॥१९॥
((अंगठ्याएवढे छोटे) वालखिल्य ऋषी पाण्यात बुडत असता त्यांनी केलेली स्तुती ऐकून विष्णूने त्यांचा उद्धार केला. वृत्राच्या वधामुळे लागलेल्या ब्रह्महत्येच्या पापापासून इंद्राची मुक्तता केली. दैत्याने कोंडल्यामुळे अनाथ झालेल्या देवस्त्रिया मुक्त केल्या. नृसिंहावतारात सज्जनांना निर्भय करण्यासाठी दैत्येंद्राचा (हिरण्यकश्यपूचा) वध केला. ॥१९॥)
बालमुकुंदावतार-वटपत्रशायी-अवतार (२२०)
मार्कंडेयो एके वेळीं । बुडतां अकाळप्रळयजळीं । तेणें स्मरतां वनमाळी । तारी तत्काळी ‘वटपत्रशायी’ ॥२२०॥
आर्तिहरण-अवतार (२२१ ते २२४)
शाळिग्राम पूजितां ऋषीश्वरीं । नळ वानरु ते अवसरी । देवपूजा टाकी सागरीं । चेष्टा वानरी स्वभावें ॥२१॥
तें देखोनि ऋषीश्वरीं । ‘शिळा न बुडोत तुझ्या करीं’ । ऐसा शाप ते अवसरीं । क्षोभेकरी दिधला ॥२२॥
तैं शाळिग्राम सागरोदरीं । तरतां देखिले ऋषीश्वरीं । काढावया रिघतां भीतरीं । लहरीकरी निर्बुजले ॥२३॥
ते काळी ऋषीश्वरीं । ‘आर्तिहरण’ स्तविला हरि । तेथ अवतरोनि श्रीहरि । ऋषीतें तारी पूजेसहित ॥२४॥
इंद्रब्रह्महत्यामोचन-अवतार (२२५, २२६)
वृत्र वधिला वज्रघातें । ते ब्रह्महत्या इंद्रातें । तेणें दोषें तो अंधतमातें । जाण पां निश्चितें बुडत होता ॥२५॥
तेथ अवतरोनि श्रीअनंतें । चतुर्धा वांटूनि ते हत्येतें । शुद्ध केलें इंद्रातें । कृपावंतें कृपाळुवें ॥२६॥
मुरारि-अवतार (२२७, २२८)
जिणोनियां अमरपुरें । हिरोनि देवांची अंतौरें । ती कोंडोनियां समग्रें । मुरे महा असुरें एकंदर केलें ॥२७॥
तो मुरमर्दन श्रीहरि । यालागी नांवें ‘मुरारि’ । देवस्त्रिया काढोनि बाहेरी । देवांच्या करीं अर्पिता झाला ॥२८॥
नरकेसरी-अवतार (२२९ ते २३१)
जो असुरांमाजीं चूडामणी । जो द्वेषियांमाजी अग्रगणी । तो हरिनाम ऐकतां कानीं । अतिक्षोभे मनी प्रज्वळों लागे ॥२९॥
जो पूर्ण क्रोधाचा उदधि । जो अविवेकाचा महानिधि । जो हरि स्मरे त्या पुत्रातें बाधी । गर्वमदीं उन्मत्त ॥२३०॥
तो हिरण्यकशिपु नखधारी । स्वयें निवटी ‘नरकेसरी’ । जो निजभक्तांचा कैवारी । अभयकारी साधूंचा ॥३१॥
देवासुरे युधि च दैत्यपतीन् सुरार्थे, हत्वाऽन्तरेषु भुवनान्यदधात्कलाभिः । भूत्वाऽथ वामन इमामहरद्धबले: क्ष्मां, याञ्चाच्छलेन समदाददितेः सुतेभ्यः ॥२०॥
(अर्थ – प्रत्येक मन्वंतरामध्ये देवदैत्यांच्या युद्धात देवकार्यार्थ भगवंतांनी आपल्या अंशाने अवतार घेऊन दैत्यपतींना ठार मारले आणि त्रिभुवनाचे रक्षण केले. वामनावतार घेऊन बलीपाशी त्रिपाद भूमीची याचना करून युक्तीने पृथ्वीचे हरण करून ती अदितीच्या मुलांना (देवांना) दिली. ॥२० ॥)
मोहिनी-अवतार (२३२ ते २३४)
समुद्रमंथनाच्या शेवटीं । क्षीरसागराचे तटीं । सुरां असुरां कळी मोठी । अमृतासाठी मांडली ॥३२॥
तेव्हां अमृत विटे जें देखोनी । तो अवतारू घेतला मोहिनी । तेणें असुरां सुरापानी । अमृतदानी देवांसी ॥३३॥
तेथ चोरूनि घेतां अमृतग्रासा । निवटिला राहूचा घसा । त्याच्या कबंधावरी म्हाळसा । वास नेवासा स्वयें केला ॥३४
कुमारावतार (२३५, २३६)
सुरसाह्य नारायणु । द्वारके कुश निर्दाळूनु । का लवणासुर मर्दूनु । अवतरे आपणु ‘कुमार’रूपें ॥३५॥
ऐसा मन्वंतरामन्वंतरीं । निजभक्तकाजकैवारी । सुरकार्यार्थ श्रीहरि । नाना अवतारी अवतरे स्वयें ॥३६॥
वामनावतार (२३७ ते २४०)
तो सुरसाह्य जगजीवन । स्वयें कुब्ज झाला ‘वामन’ । अंगें याचक होऊन । देवांचा अपमान उतरला जेणें ॥३७॥
दानें दाटुगा बळी । त्यासी देवांचेनि नव्हे कळी । मग त्रिविक्रमरूपें आकळी । याञ्चाछळे बळी छळिला जेणें ॥३८॥
तरी भावबळे बळी प्रबळु । तेणें देवो केला द्वारपाळु । विष्णु सत्त्व पाहे छळछळू । शेखी दासांचा दयाळु दास्य करी स्वयें ॥३९॥
यापरी बळीचा छळ । करूनि घेतलें दिङ्मंडळ । तेणें अमरगण सकळ । अर्पूनि तत्काळ सुखी केले ॥२४० ॥
निःक्षत्रियामकृत गां च त्रिःसप्तकृत्वो रामस्तु हैहयकुलाप्ययभार्गवाग्निः । सोऽब्धिं बबन्ध दशवक्त्रमहन्सलङ्कं सीतापतिर्जयति लोकमलघ्नकीर्तिः ॥२१॥
(हैहय कुलाचा नाश करण्यासाठी साक्षात अग्नी अशा परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. प्रभू रामचंद्राने समुद्रावर सेतू बांधला, रावणाला मारले व लंकेचाही नाश केला. स्मरण-कीर्तनाने प्राणिमात्रांचे पाप नाहीसे करणारा सीतापती प्रभू रामचंद्र अद्यापीही आपल्या तेजाने प्रकाशत आहे. ॥२१॥)
परशुरामावतार (२४१ ते २४४)
तो देवाधिदेवोत्तमु । स्वयें झाला ‘परशुरामु’ । तेणें क्षत्रियांचा पराक्रमु । केला निर्धर्मु निजप्रतापें ॥४१॥
तो गोब्राह्मणकैवारी । सहस्रार्जुनातें संहारी । सहस्र भुजांची कांडोरीं करी । केली बोहरी दानवकुळा ॥४२॥
जमदग्नीचा कोपाग्नि । परशुरामतेजें प्रज्वळूनि । हैहयकुळ जाळूनि । आहाळिली अवनी क्षत्रियांची ॥४३॥
तेणें तीन सप्तकें वीररसु । देऊनि क्षत्रियमद बहुवसु । त्या रोगाचा केला नाशु । धरेचे ईशु धरामर केले ॥४४॥
रामावतार (२४५ ते २५४)
जो अवतारांचे मूळ पीठ । जो वीरवृत्ति अतिउद्भट । तो अवतारांमाजी श्रेष्ठ । अतिवरिष्ठ ‘श्रीराम’ ॥४५॥
पापें पळती रामनामें । नामांकित वंदिजे यमें । गणिकेची कर्माकर्मे । श्रीरामनामें निर्दळिलीं ॥४६॥
नामें कळिकाळासी धाक । यमदूतां न मिळे भीक । रामनामगजरें देख । पळे निःशेख जन्ममरण ॥४७॥
जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी । जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥
ज्याचेनि शिळा तरती सागरीं । असुर मारिले वानरीं । जेणे सुवर्णाची नगरी । वोपिली पुरी शरणागतासी ॥४९॥
जो प्रतापाचा मरिगळा । जेणें सेतु बांधिला अवलीळा । चरणी उद्धरिली शिळा । जो निजजिव्हाळा निजभक्तां ॥२५०॥
तो अवतार मूर्तिमंत । राया अद्यापि असे वर्तत । हा संवाद त्रेतायुगांत । द्रुमिल सांगत विदेहासी ॥५१॥
यालागीं श्रीराम राम । नित्य जपे जो हे नाम । तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । कर्माकर्म-अतीत तो ॥५२॥
तें रामनाम अवचटें । भीतरी रिघे कर्णपुटें । तैं कळिमळांची मळकटें । नामोद्धाटें नासती ॥५३॥
ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारे केली कीर्ती । धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित ॥५४॥

७५३.नामदेवें केलें स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितले काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनी केलें सावधान ॥३॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटी लावी तुका ॥४॥
७५४.द्याल ठाव तरी राहेन संगती । संतांचे पंगती पायां-पाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदा-सीन न धरावें ॥ध्रु॥
शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥३॥
नामदेवापायीं तुकया स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥४॥
७५५.अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु॥
ऐसा हा निवाडा झालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥३॥
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ॥४॥
७५६.त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणाजोगें । एक जातां लागे । एक पाठी लागतें ॥१॥
मागे पुढे अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ। कृपें खांदा हरि वाहे ॥ध्रु॥
पापपुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती । तेथें सत्तानायका ॥३॥
तुका उभा पैलथडी । तरि हे प्रकार निवडी । घातल्या सांगडी। ताफे पेटे हाकारी ॥४॥
७५७.देखण्याच्या तीन जाती। वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥
जैसा भाव तैसें फळ । स्वाती तोय एक जळ ॥ध्रु॥
पाहेसांगे आणि जेवी। अंतर महदंतर तेवीं ॥३॥
तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥४॥
७५८.अनुभवें अनुभव अवघाचि साधिला । तरि स्थिरा-वला मन ठायीं ॥१॥
पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध ते असार होऊनियां ॥ध्रु॥
एकचि उरले कायावाचामना । आनंद भुवनामाजीं त्रयीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥४॥
७५९.ऐसिया संपत्ती आम्हां संवसारीं । भोगाचिया परी काय सांगों? ॥१॥
काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगने हेवा चरण चुंबीं ॥ध्रु॥
शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धि ॥३॥
तुका म्हणे पाहे तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥४॥
७६०.राम राज्य राम प्रजा लोकपाळ। एकचि सकळ दुजें नाहीं ॥१॥
मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एकी रासी ॥ध्रु॥
मोडले हे स्वामी ठायाठाव सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगें? ॥३॥
तुका म्हणे अवघे दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हेचि आतां ॥४॥
७६१.निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरी ते ॥१॥
जयाचा विभाग तयासीच फळे। देखणे निराळे कौतुकासी ॥ध्रु॥
शूर तो ओळखे घायडाय हात । येरां होईल मात सांगायासी ॥३॥
तुका म्हणे माझी केळवली वाणी । केला निजस्थानी जानवसा॥४॥
७६२.याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चिंतीने पावलों विसांवा । खुंट-लिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु॥
कवतुक वाटे झालिया वेंचाचें। नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥
७६३.भक्तिचिया पोटीं रत्नाचिया खाणी । ब्रह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥ध्रु॥
माउलीचे मागे बाळकांची हारी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥२॥
जेथील जे मागें तें रायासमोर । ‘नाहींसें’ उत्तर येत नाहीं ॥३॥
सेवेचिये सत्ते धनीच सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥४॥
आदि अंत ठाव असे मध्यभाग । भोवतें भासे जग उच्चासनीं ॥५॥
भावारूढ तुका झाला एकाएकीं । देवचि लौकिकी अवघा केला ॥६॥
७६४.सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटी कैंचा घडे? ॥१॥
भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्या सादर चित्त कथे ॥ध्रु॥
नाइकवे कानीं साधन उपाय । ऐके तो गाय हरुषे गीत ॥३॥
नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामि मना हरिकथेचा ॥४॥
काळाच्या साधना कोणा अंगीं बळ? । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥५॥
तुका म्हणे आम्ही खेळो भातुकुलें । विभागासी मुले भोळी येथे ॥६॥
७६५.जाणपण बरें देवाचें तें शिरीं! । आम्ही ऐसी बरी नेणतींच!॥१॥
देखणियापुढे रुचे कवतुक। उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु॥
आशंकेची बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरि खेळा समबुद्धि ॥३॥
तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशी खेळा ठाव झाला ॥४॥
७६६.वचनाचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे? ॥१॥
जातां घरा, मागे उरों नेणे खंती। मिळाल्या बहुती फांकलिया ॥ध्रु॥
उदयींच अस्त उदये संपादिला । कल्पनेचा केला जागेपणें ॥३॥
जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करूनि तुका ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top