दिवस – ५७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

हां गा, नामचि एक जयाचें । पाहतां, गगनही दिसे टांचें । गुण एकैक काय तयाचे । आकळिशील तूं?’ ॥१११॥
म्हणौनि असो हें वाणणें । सांगों नेणों-कवणाचीं लक्षणें । दाविलीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥११२॥
ऐकें, द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी, अर्जुना पढिये; हे गोडी । नासेल हन ॥११३॥
म्हणौनि तें तैसे बोलणें । नव्हे, सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥११४॥
जया सोऽहंभाव अटुंकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा, झणें, कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥११५॥
विपायें अहभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया? ॥११६॥
दिठीचि पाहतां निविजे । कां, तोंड भरूनि बोलिजे । नातरी दाटूनि खेव दीजे । ऐसें कवण आहे?॥११७॥
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें? ॥११८॥
इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातसणें । बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ॥११९॥
हें परिसता जरी कानडें । तरी जाण पां, “पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा” ॥१२०॥
हें असो, वयसेचिये शेवटीं । जैसें, एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिकुटी । नाचों लागे ॥१२१॥
तैसें जाहलें श्रीअनंता । ऐसें तरी मी न म्हणतां । जरी तयाचा न देखतां । अतिशयो येथ ॥१२२॥
पाहा पां, नवल कैसें चोज । कैं उपदेशु; केउतें झुंज! । परि पुढें वालभाचें भोज । नाचत असे ॥१२३॥
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काई? ॥१२४॥
म्हणौनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं, सुखें शृंगारलिया मानसा । दर्पणि तो ॥१२५॥
यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो श्रीकृष्णकृपे पात्र । याचि लागीं ॥१२६॥
हो कां, आत्मनिवेदनांतलीची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥१२७॥
पासींचि गोसावी न वानिजे । मागां पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुन तो सहजें । पढिये हरी ॥१२८॥
पाहा पां, अनुरागें भजें । जे प्रियोत्तमें मानिजे । ते, पतीहूनि काय, न वानिजे । पतिव्रता?॥१२९॥
तैसा, अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे, तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ॥१३०॥

कलियुगमहिमा-भक्तीने चारी मुक्ती (४०२ ते ४५०)

त्यांमाजी कलियुगाची थोरी । वानिजे सद्भावें ऋषीश्वरीं । येथे हरिकीर्तनावरी । मुक्ती चारी वोळगण्या ॥४०२॥
कलिं सभाजयन्त्यार्या, गुणज्ञाः सारभागिनः । यत्र सङ्कीर्तनेनैव, सर्वः स्वार्थोऽभिलभ्यते ॥३६॥
(गुण जाणणारे आणि केवळ उत्तमाचा अंगीकार करणारे श्रेष्ठ साधू कलियुगाला उघडउघड वंदन करितात. कारण कलियुगात केवळ (भगवंताच्या) नामसंकीर्तनाने सर्व प्रकारचे इष्ट पुरुषार्थ प्राप्त होतात. ॥३६॥)
अवधारी राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा । जेथ सर्व स्वार्थ हरिकीर्तना- । नामस्मरणासाठी होती ॥४०३॥
कलियुगी दोष बहुत । केवीं कीर्तने होय स्वार्थ । तेथें दोषत्यागें जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥४०४॥
हरिकीर्तनें शुद्ध चित्त । दोषत्यागें गुण संग्रहीत । ऐसे सारभागी कलियुगांत । परममुक्त हरिकीर्तनें ॥४०५॥
कलीच्या गुणांतें जाणते । नामें मोक्ष जोडणे येथें । जाणोनि करिती कीर्तनातें । ते जाण निश्चितें नित्यमुक्त ॥४०६॥
कलियुगी हेचि सार । नाम स्मरावें निरंतर । करिती नामाचा निजगजर । ते मुक्त नर नृपनाथा ॥४०७॥
(संमत श्लोक) ध्यायन्कृते यजन्यज्ञैस्त्रेतायां द्वापरेऽर्चयन् । यदाप्नोति तदाप्नोति कलौ सङ्कीर्त्य केशवम् ॥
कृतयुगी शमदमादिसाधन । त्रेतायुगीं वेदोक्त यज्ञ । द्वापरी आगमोक्त पूजन । तंत्रविधान विधियुक्त ॥४०८॥
यापरी त्रियुगी जना । परम संकट साधना । करितांही परी मना । अणुमात्र जाणा उपरमु नव्हे ॥४०९॥
ती अवघींच साधनें । कलीने लाजविली कीर्तनें । जेथ गातां नाचतां आपणें । वश्य करणे परमात्मा ॥४१०॥
आखरी हुंबळी गुणें । ऐकतां गोवळांचे गाणे । देव भुलला जीवेंप्राणें । त्यांसवें नाचणे स्वानंदें ॥४११॥
कृष्णा कान्हो गोपाळा । या आरुष नामांचा चाळा । घेऊन गर्जती वेळोवेळां । तेणें घनसांवळा सुखावे ॥४१२॥
तेणें सुखाचेनि संतोषें । देवो परमानंदें उल्हासे । एवं कलियुगी कीर्तनवशें । भक्त अनायासें उद्धरती ॥४१३॥
कीर्तनआवर्तनमेळीं । जळती पापांच्या वडवाळी । भक्त उद्धरती तत्काळीं । हरिनामें कलि दाटुगा ॥४१४॥
कलियुगी हेचि थोरी । नामसंकीर्तनावारी । चहूं वर्णां मुक्त करी । तेथ न विचारी स्त्री शूद्र ॥४१५॥
वेदु अत्यंत कृपणु जाला । त्रिवर्णीचे कानीं लागला । स्त्रीशूद्रादिकांसी अबोला । धरूनि ठेला अद्यापि ॥४१६॥
तें वेदाचें अतिन्यून । उद्धरी हरिनामकीर्तन । स्त्री शूद्र अंत्यज जन । उद्धरण हरिनामें ॥४१७॥
कीर्तने स्वधर्मु वाढे । कीर्तने स्वधर्मु जोडे । कीर्तनें परब्रह्म आतुडे । मुक्ति कीर्तनापुढे लाजोनि जाय ॥४१८॥
कीर्तनानंदें चारी मुक्ति । हरिभक्तांतें वरूं येती । भक्त त्यांतें उपेक्षिती । तरी पायां लागती दास्यत्वें ॥४१९॥
एवढी कलियुगी प्रचीती । कीर्तनाची परम ख्याती । राया जाण गा निश्चितीं । विकल्प चित्तीं झणे धरिसी॥४२०॥
कृतत्रेताद्वापारासी । निषेधु नाहीं नामासी । कलियुगी नामापाशीं । चारी मुक्ती दासी स्वयें होती ॥४२१॥
न ह्यतः परमो लाभो, देहिनां भ्राम्यतामिह । यतो विन्देत परमां शान्तिं नश्यति संसृतिः॥३७॥
(ह्या कलियुगात (नामस्मरणाच्या साधनाने) संसारचक्रात भ्रमण करणाऱ्या जीवांना परमशांती मिळून संसारबंध नाहीसा होतो; म्हणून त्या लाभापेक्षा श्रेष्ठतर लाभ दुसरा कोणताही नाही. ॥३७॥)
जे जन्ममरणांच्या आवर्ती । पडिले, संसारीं सदा भ्रमती । त्या प्राणियां कलियुगाप्रती । कीर्तने गती नृपनाथा ॥४२२॥
कलियुगी कीर्तनासाठीं । संसाराची काढूनि कांटी । परमशांतिसुखसंतुष्टीं । पडे मिठी परमानंदीं ॥४२३ ॥
ऐसा कीर्तनीं परम लाभु । शिणतां सुरनरां दुर्लभु । तो कलियुगी झाला सुलभु । यालागी सभाग्यां लोभु हरिकीर्तनीं ॥४२४॥
‘कीर्तनास्तव चारी मुक्ती । भक्तांपासीं वोळंगती । हे न घडे’ कोणी म्हणती । ऐक ते स्थिती नृपनाथा ॥४२५॥
कीर्तनीं हरिनामाचा पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं सांडोनि वैकुंठा । धांवे अवचटा कीर्तनामाजीं ॥४२६॥
हरिकीर्तना लोधला देवो । विसरला वैकुंठा जावों । तोचि आवडला ठावो । भक्तभावो देखोनी ॥४२७॥
जेथ राहिला यदुनायक । तेथचि ये वैकुंठलोक । यापरी मुक्ति ‘सलोक’ । कीर्तनें देख पावती भक्त ॥४२८॥
नामकीर्तन-निजगजरी । भक्तां निकट धांवे श्रीहरी । तेचि ‘समीपता’ मुक्ति खरी । भक्तांच्या करीं हरिकीर्तनें ॥४२९॥
कीर्तनें तोषला अधोक्षज । भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज । श्याम पीतवासा चतुर्भुज । तें ध्यान सहज ठसावे ॥४३०॥
भक्तु कीर्तन करी जेणें ध्यानें । तें ध्यान दृढ ठसावें मनें । तेव्हां देवाची निजचिन्हें । भक्ते पावणे संपूर्ण ॥४३१॥
श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंखचक्रादि आयुधे करीं । हे ‘सरूपता’ भक्तातें वरी । कीर्तनगजरी भाळोनी ॥४३२॥
तेव्हां देव भक्त समसमान । समान अवयव सम चिन्ह । भावें करितां हरिकीर्तन । एवढे महिमान हरिभक्तां ॥४३३॥
दोघां एकत्र रमा देखे । देवो कोण तेंही नोळखे । ब्रह्मा नमस्कारी चवके । देवो तात्त्विकें न कळे त्यासी ॥४३४॥
भावें करितां हरिकीर्तन । तेणें संतोषे जनार्दन । उभयतां पडे आलिंगन । मिठी परतोन सुटेना ॥४३५॥
तेव्हां सबाह्यांतरी । देवो प्रगटे चराचरी । दुजें देखावया संसारीं । सर्वथा उरी उरेना ॥४३६॥
वृत्ति स्वानंदी निमग्न । परतोनि कदा नव्हे भिन्न । ‘सायुज्यमुक्ति’ या नांव पूर्ण । जेणें दुजेपण असेना ॥४३७॥
ऐशी लाहूनि पूर्ण सायुज्यता । तो जैं करी हरिकथा । ते कथेची तल्लीनता । जीवां समस्तां अतिप्रिय ॥४३८॥
यापरी हरिकीर्तनापासीं । चारी मुक्ती होती दासी । भक्त लोधले हरिभजनासी । सर्वथा मुक्तीसी न घेती ॥४३९॥
एवं योगयागादि तपसाधनें । पोरटी केली हरिकीर्तनें । कलियुगी नामस्मरणें । जड उद्धरणे हरिकीर्तनीं ॥४४०॥
कृतादिषु प्रजा राजन् , कलाविच्छन्ति संभवम् । कलौ खलु भविष्यन्ति, नारायणपरायणाः ॥३८॥
(हे राजा, कृत, त्रेत व द्वापर या युगांतील प्रजा कलियुगात जन्म यावा अशी इच्छा करतात; कारण या युगातच खरोखर नारायणाचे भजन करणारे लोक जन्माला येतील (अवतार घेतील). ॥३८ ॥)
कीर्तनासाठी चारी मुक्ति । हेचि कलियुगी मुख्य भक्ति । यालागीं इंद्रादि देवपंक्ति । जन्म इच्छिती कलियुगीं ॥४४१॥
स्वर्ग नव्हे भोगस्थान । हे विषयाचे बंदिखान । कलियुगी सभाग्य जन । जन्मोनि कीर्तन हरीचे करिती ॥४४२॥
जेथींच्या जन्मा देव सकाम । तेथ कृतादि युगींचे उत्तमोत्तम । प्रजा अवश्य वांछिती जन्म । कीर्तनधर्म निजभजना॥४४३॥
कृतयुगींचे सभाग्य जन । यागी पावले स्वर्गस्थान । तेही कलियुगींचें जाण । जन्म आपण वांछिती ॥४४४॥
कृत त्रेत आणि द्वापर । तेथीलही मुख्य नर । कलियुगी जन्म तत्पर । निरंतर वांछिती ॥४४५॥
तैंचे लोक करिती गोष्टी । चारी पुरुषार्थ कीर्तनासाठीं । कलियुगी हे महिमा मोठी । धन्य धन्य सृष्टी कलियुग ॥४४६॥
जे असती धन्यभागी । ते जन्म पावती कलियुगीं । ऐसें कलीच्या जन्मालागीं । नर-सुर-उरगी उत्कंठा ॥४४७॥
तरावया दीन जन । कलीमाजीं श्रीनारायण । नामें छेदी भवबंधन । तारी हरिकीर्तन सकळांसी ॥४४८॥
यालागी कलिमाजी पाहीं । श्रद्धा हरिकीर्तनाच्या ठायीं । जन तरती सुखोपायीं । संदेहो नाहीं नृपनाथा ॥४४९॥
कलियुगी बहुसाल नर । होतील नारायणी तत्पर । भक्तीचे भोज विचित्र । स्त्रीशूद्र माजविती ॥४५०॥

९१०.जळों आतां नांव रूप । माझें पाप गांठीचें ॥१॥
संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु॥
लटि-क्याचा अभिमान । होता शीण पाववीत ॥३॥
तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनावें ॥४॥
९११.निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥
जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु॥
शृंगारिलें मढें । जीवेंवीण जैसें कुडें ॥३॥
तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥४॥
९१२.भिक्षापात्र अवलंबणें। जळो जिणे लाजिर-वाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
देवा पायीं नाहीं भाव। भक्ति वरीवरी वाव। समर्पिला जीव । नाहीं, तो हा व्यभिचार ॥ध्रु॥
जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें। हेचि अभाग्य रोकडें। मूळ आणि अविश्वास ॥३॥
काय न करी विश्वंभर? । सत्य करितां निर्धार। तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥४॥
९१३.भावबळे विष्णुदास । नाहीं नाश पावत ॥१॥
योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ति चालत ॥ध्रु॥
पित्याचे जे काय धन । पुत्रा कोण वंचील? ॥३॥
तुका म्हणे कडे बैसों । तेणे असों निर्भर ॥४॥
९१४.कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल॥१॥
कोण याचें मना आणी? । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु॥
घरोघरी सांगती ज्ञान । भूस शीण कांडती ॥३॥
तुका म्हणे आपुल्या मति। काय रिती पोकळ ॥४॥
९१५.नव्हतियाचा सोस होता । झडों आतां पदर ॥१॥
देखणें तें देखियलें । आतां भले साक्षित्वें ॥ध्रु॥
लाभ कळों आली हानि । राहों दोन्ही निराळीं ॥३॥
तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा? ॥४॥
९१६.सोसे वाढे दोष । झाला न पालटे कस ॥१॥
ऐसें बरवें वचन । ‘करिता तो नारायण’ ॥ध्रु॥
असे प्रारब्ध नेमें । श्रमचि उरे श्रमें ॥३॥
सुख देते, शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥४॥
९१७.काय शरीरापे काम? । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले तें करूं ॥१॥
देईन हाक नारायणा । ते तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु॥
सातां पांचांचें गोठलें । प्रारब्धें आका-रलें । आतां हें संचलें । असो भोगा सांभाळीं ॥३॥
फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धि । तुका म्हणे मधीं । कोठें नेघे विसांवा ॥४॥
९१८.नलगे देशकाळ। मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ। करूनि, करुणा भाकावी ॥१॥
येतो बैसलिया ठाया। आसनें व्यापी देवराया । निर्मळ ते काया। अधिष्ठान तयाचें ॥ध्रु॥
कल्पनेचा साक्षी । तरि आदरेंचि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडे धान्य मटमटां ॥३॥
घेणे तरि भाव । लक्षी दासाचा उपाव । तुका म्हणे जीव-। जीवीं मेळविल अनंत ॥४॥
९१९.भक्तिसुख आले नाही अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं? ॥१॥
नसावें जी तुम्ही काही निश्चिंतीनें। माझिया वचनें अभेदाच्या ॥ध्रु॥
एकाएकी मन नेदी समा-धान । देखिल्या चरण वांचूनियां ॥३॥
तुका म्हणे वाचा गुणी लांचावली । न राहे उगली मौन्य मज ॥४॥
९२०.मागता विभाग । कोठे लपाल जी मग? ॥१॥
संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकीया खुणा ॥ध्रु॥
होईन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥३॥
तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥४॥
९२१.जिंकावा संसार । येणे नांवे तरी शूर ॥१॥
येर काय ती बापुडीं ? । कीर अहंकाराची घोडी ॥ध्रु॥
पण ऐशा नांवें । देव धरिजे तो भावें ॥३॥
तुका म्हणे ज्यावें । सत्कीर्तीने बरवें ॥४॥
९२२.मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं ॥१॥
कोण पडें ये लिगाडीं ? । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु॥
केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥३॥
तुका म्हणे आतां । असो तुमचे तुमचे माथां ॥४॥
९२३.समर्पिली वाणी । पांडुरंगी घेते धणी॥१॥
पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु॥
धार अखंडीत । ओघ चालियेला नित्य ॥३॥
पूर्णाहुती जीव । तुका घेऊनि ठेला भाव ॥४॥
९२४.अवघाचि आकार ग्रासियेला काळे । एकचि निराळे हरीचें नाम ॥१॥
धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हे पोटीं सांठविले ॥ध्रु॥
शरीर संपत्ति मृगजळभान । जाईल नासोन, खरे नव्हे ॥३॥
तुका म्हणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥४॥
९२५.बोलणेंचि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥
एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु॥
पाहेन ते पाय । जोंवरि हे दृष्टी धाय ॥३॥
तुका म्हणे मनें । हेचि संकल्प वाहाणें ॥४॥
९२६.येथूनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥
उंच देवाचे चरण । तेथें झालें अधिष्ठान ॥ध्रु॥
आघाता वेगळा । असे ठाव हा निराळा ॥३॥
तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top