दिवस – ६०. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः । उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥१२॥
मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करूनि सद्गुरू-स्मरण । अनुभविजे ॥१८६॥
जेथ स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे । जंव काठिण्य विरे । अहंभावाचें ॥१८७॥
विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजी ॥१८८॥
ऐसें ऐक्य हें सहजें । फांवे, तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥१८९॥
आतां आंगातें आंग धरी । पवनातें पवनु धरी । ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥१९०॥
प्रवृत्ति माघौती मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । आघवा अभ्यासु सरे । बैसतखेवो ॥१९१॥
मुद्रेची प्रौढी ऐसी । तेचि सांगिजेल आतां, परियेसीं । तरी ऊरू या जघनासी । जडोनि घालीं ॥१९२॥
चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाच्या बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥१९३॥
सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यें पीडिजे । वरी बैसे तो सहजें । वाम चरणु ॥१९४॥
गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां ॥१९५॥
माजीं अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें । नेहटिजे; वरि आंगें । पेललेनि ॥१९६॥
उचलिलें कां, नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥१९७॥
मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा । पाष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥१९८॥
अर्जुना, हें जाण । मूळबंधाचें लक्षण । “वज्रासन” गौण । नाम यासी ॥१९९॥
ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि अधोमार्गु मोडे । तेथ, अपानु आंतुलेकडे । वोहटों लागे ॥२००॥
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥१३॥
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥२०१॥
माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥२०२॥
वरचिलीं पातीं ढळतीं । तळींचीं तळीं पुंजाळतीं । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥२०३॥
दिठी राहोनि आंतुलिकडे । बाहेर पाउल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥२०४॥
ऐसें आंतुचिया आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥२०५॥
आतां दिशांची भेटी घ्यावी । कां, रूपाची वास पाहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥२०६॥
मग कंठनाळ आटे । हनुवटी हाडौती दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥२०७॥
माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥२०८॥
नाभीवरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ॥२०९॥
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्यानातळवटीं । बंधु पडे, किरीटी । वोढियाणा तो ॥२१०॥

श्रीशुक उवाच – एतच्छ्रुत्वा महाभागो वसुदेवोऽतिविस्मितः । देवकी च महाभागा जहतुर्मोहमात्मनः ॥५१॥
(शुकाचार्य म्हणाले हे सर्व ऐकल्यानंतर महाभाग्यशाली वसुदेव आणि भाग्यवान देवकी अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि त्या दोघांनी आपल्या अंतःकरणातील मोह सोडून दिला. ॥५१॥)
निमिजायंत मुनिगण । इतिहास पुरातन जीर्ण । कृष्ण परमात्मा ब्रह्म पूर्ण । नारद आपण निरूपी हर्षे ॥४४॥
शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि नारदावचनोक्ती । देवकीवसुदेवो चित्तीं । अतिविस्मिती तटस्थ ॥४५॥
तया नारदाचेनि वचनें । कृष्ण परमात्मा बोलें येणें । देवकी वसुदेव निजमनें । दोघे जणे विस्मित ॥४६॥
ती परम भाग्यवंत दोन्ही । जो पुत्रस्नेहो होता श्रीकृष्णीं । तो सांडोनियां तत्क्षणीं । कृष्णपरब्रह्मपणीं निश्चयो केला ॥४७॥
श्रीकृष्णीं ब्रह्मभावो । धरितां निःशेष मोहस्नेहो । हृदयींचा निघोनि गेला पहा हो । बाप नवलावो भाग्याचा ॥४८॥

पंचाध्यायमहिमा (५४९ ते ५६५)

इतिहासमिमं पुण्यं, धारयेद्यः समाहितः । स विधूयेह शमलं, ब्रह्मभूयाय कल्पते ॥५२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे पंचमोऽध्यायः ॥
(याप्रमाणे (भागवतधर्माच्या निरूपणाने भरलेला) हा पुण्यपावन इतिहास जो कोणी स्थिर बुद्धीने श्रवण करून निदिध्यासन करील, त्याचे चित्तातील मल नाहीसा होऊन तो ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीला अधिकारी होईल.॥५२॥)
जो निमि-जायंतसंवादु । वसुदेवा सांगे नारदु । हा इतिहास अतिशुद्ध । जीवशिवभेदुच्छेदकु ॥४९॥
सावधानपणे श्रोता । तल्लीन होऊनि तत्त्वतां । हे इतिहासाची कथा । सादरता जो परिसे ॥५५०॥
तेणें सकळ पुण्यांचिया राशी । श्रवणें जोडिल्या अहर्निशीं । तो गा पुरुषु अवश्यतेसी । ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र ॥५१॥
सार्थक एक एक पद । परिसतां होय अंतर शुद्ध । यालागी पावे ब्रह्मपद । परमानंद निजबोधे ॥५२॥
हे ‘पंचाध्यायी’ म्हणणे घडे । पंचवक्त्र चंद्रचूडें । एकादशाचें ज्ञान गाढ़ें । वर्णावया फुडें ध्वज उभविला ॥५३॥
हे पंचाध्यायी नव्हे जाण । एकादशाचे पंचप्राण । उपदेशावया शुद्ध ज्ञान । सामोरे आपण स्वभक्तां आले ॥५४॥
हे पंचाध्यायी नव्हे केवळ । पंचम आलापे शुककोकिळ । एकादश वसंतकाळ । भक्त-अलिकुळ आलापवी स्वयें ॥५५॥
हाही नव्हे प्रकार । हे शर्करा पंचधार । चाखों धाडिली सत्वर । ज्ञानगंभीर निजभक्त ॥५६॥
हे पंचाध्यायी नव्हे सिद्ध । एकादशाचे पंच गंध । भक्त आंवतावया शुद्ध । धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता ॥५७॥
एकादश अतिविवेकी । यावया पंचाध्यायी पालखी । पुढे धाडिली कवतुकीं । निजभक्तविखीं कृपाळुवें ॥५८॥
हे कृष्ण-उद्धवअर्धमात्रा । अर्धोदयो महायात्रा । ते यात्रेलागी हांकारा । पंचाध्यायी खरा साधकां करी ॥५९॥
श्रीकृष्णउद्धवमेळा । देखोनि ब्रह्मसुखाचा सोहळा । तो सांगों आली कळवळा । भक्तांजवळां पंचाध्यायी ॥५६०॥
अहंकाराचें मेट होतें । तें उठवूनि श्रीकृष्णनाथें । केलें आत्मतीर्थे मुक्ते । अभयहस्ते उद्धवासी ॥६१ ॥
ते मुक्ततीर्थनवाई । पुढे सांगों आली पंचाध्यायी । संसारश्रांत जे जे काहीं । ते धांवा लवलाही विश्रांतीसी ॥६२॥
कृष्णउद्धवगोडगोष्टी । हे निर्विकल्प कपिलाषष्ठी । ते पर्वकाळकसवटी । सांगों उठाउठी पंचाध्यायी आली ॥६३॥
उद्धवालागीं भवसागरीं । उतरावया पायउतारी । भागवतमिषे श्रीहरी । सुगम सोपारी पायवाट केली ॥६४॥
पव्हणियाहूनि पायउतारा । भागवतमार्ग अतिसोपारा । तो मार्गु दावावया पुरा । हांकारी स्त्रीशूद्रां पंचाध्यायी ॥६५॥

सहाव्या अध्यायाचा प्रस्ताव (५६६ ते ५७६)

पुढील निरूपणआवडी । अतिशये वाढे चढोवढी । ते कृष्णवाक्यरसगोडी । पंचाध्यायी फुडी साधावया सांगे ॥६६॥
कृष्णउद्धवसंवादीं । होईल परब्रह्म-गवादी । साधकमुमुक्षांची मांदी । धांवे त्रिशुद्धी निजसुखार्थ ॥६७॥
परब्रह्म झालें सावेव । स्वरूपसुंदर ज्ञानगौरव । मनोहर रूपवैभव । स्वर्गीचे देव पाहों येती ॥६८ ॥
तो देवांचा स्तुतिवादु । सवेंचि उद्धवाचा निर्वेदु । कृष्णउद्धवमहाबोधु । जेणें परमानंदु वोसंडे ॥६९ ॥
ते पुढील अध्यायीं कथा । रसाळ सांगेन आतां । अवधान द्यावें श्रोतां । ग्रंथार्था निजबोधे ॥५७० ॥
स्वयें वावडी करूनि पूर्ण । तिसी उडविजे जेवीं आपण । मग उडालेपणे जाण । आपल्या आपण संतोषिजे ॥७१ ॥
तेवीं मजनांवें कविता । करूनि स्वयें सद्गुरु वक्ता । एवं वदवूनियां ग्रंथार्था । श्रोतेरूपें सर्वथा संतोषे स्वयें ॥७२॥
तो एकपणेंवीण एकला एका । दुजेनवीण जनार्दनु सखा । तेणे पुढील ग्रंथआवांका । विशदार्थे देखा विवंचिला ॥७३॥
नातळोनि दुजेपण । एका जनार्दना शरण । धरोनि श्रोत्यांचे चरण । पुढील अनुसंधान पावेल ॥७४॥
एका जनार्दन नांवें देख । दों नांवीं स्वरूप एक । हे जाणे तो आवश्यक । परम सुख स्वयें पावे ॥७५॥
एकाजनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण । पंचाध्यायी निरूपण । झाली संपूर्ण जनार्दनकृपा ॥५७६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकारटीकायां पंचमोऽध्यायः ॥५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पाचवा अध्याय समाप्त (श्लोक ५२; ओव्या ५७६)

९५८.नामाचे पवाडे बोलती पुराणें । ‘होऊनि कीर्तनें तोचि ठेला’ ॥ध्रु॥
आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र । आवडीचे स्तोत्र सदा घोकी ॥२॥
आगळे हे सार उत्तमा उत्तम । ब्रह्मकर्मा नाम एक तुझें ॥३॥
तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥४॥
परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त झाला वाचा उच्चारितां ॥५॥
कोळियाची कीर्ति वाढली गहन । केलें रामायण रामाआधीं ॥६॥
‘सगुण निर्गुण’ तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाहीं नामीं ॥७॥
९५९.भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारी सर्व-भावें ॥१॥
शिकल्या बोलाचा धरिशील ताठा। तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परि जन संतां तैसी ॥३॥
सरिता वोहोळ गंगा सागरा समान । लेखी, तयाहून अधम नाही ॥४॥
आणीक अमुप होती तारांगणे । रविंसी समान लेखूं नये ॥५॥
तुका म्हणे नाहीं नम्रता अंगीं । नव्हे ते फिरंगी कठिण लोह ॥६॥
९६०.आणीक मज कांहीं नावडती मात । एका पंढरीनाथा-वांचूनियां ॥१॥
त्याचीच कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवण गोड लागे ॥ध्रु॥
तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनीं कांहीं ॥३॥
९६१.ठेवा जाणीव गुंडून । येथें भावचि प्रमाण ॥१॥
एका अनुसरल्या काज। अवघे जाणे पंढरीराज ॥ध्रु॥
तर्कवितर्कासी । ठाव न लगे सायासी ॥३॥
तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो शीण ॥४॥
९६२.येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एकचित्तें । करूनि रितें कलेवर॥ध्रु॥
षड्ऊर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥३॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥४॥
९६३.‘मुक्त’ तो आशंका नाहीं जया अंगीं । ‘बद्ध’ मोहो संगी लज्जा चिंता ॥१॥
सुख पावे शांती धरूनि एकांत । ‘दु:खी’ तो लोकांत दंभ करी ॥ध्रु॥
तुका म्हणे लागे थोडाच विचार । परि हे प्रकार नागविती ॥३॥
९६४.कानीं धरी बोल बहुतांची मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥
पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥ध्रु॥
शब्दज्ञानी एक आपुलाल्या मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥३॥
तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडी ॥४॥
९६५.देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ति । तया इच्छा गति । हेचि सुख आगळें ॥१॥
या या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धि द्वारी । कर जोडूनि तिष्ठती ॥ध्रु॥
नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळी नामाचा ॥३॥
तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा! । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठीं ॥४॥
९६६.न पूजी आणिकां देवां न करी त्यांची सेवा । न मनी या केशवाविण दुजें ॥१॥
काय उणें झालें मज तया पायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु॥
आणिकांची कीर्ति नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥३॥
न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि नवजे कोठे ॥४॥
न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥५॥
तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥६॥
९६७.नव्हें खळवादी मताचि पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥
साक्षत्वेसि मना आणावीं उत्तरें। परिपाकी खरे खोटे कळे ॥ध्रु॥
नव्हे एकदेशी शब्द, हा उखता। ब्रह्मांडा-पुरता घेईल त्यासी ॥३॥
तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वायां श्रमों नये ॥४॥
९६८.कथा करोनियां द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥१॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । न ये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥३॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥४॥
९६९.नाइकावे कानीं तयांचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥
वाखाणी अद्वैत भक्तिभावेंविण । दु:ख पावे शीण श्रोता वक्ता ॥ध्रु॥
‘अहं ब्रह्म’ म्हणोनि पाळीतसे पिंडा । न बोलावें भांडा तयासवें ॥३॥
वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचे काळें तोंड संतांमध्यें ॥४॥
तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥५॥
९७०.वेदविहित तुम्ही आइका हो कर्मे । बोलतों ती वर्मे संतांपुढे ॥१॥
चारी वर्ण झाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिले॥ध्रु॥
प्रथम पाउलीं पावविला पंथ। आदि मध्य अंत भेद नाहीं ॥३॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुण भिन्न अग्नि एक ॥४॥
तुका म्हणे मन उन्मन जो होय । तोंवरी हे सोय विधि पाळीं ॥५॥
९७१.तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ । ब्रह्म ते केवळ पंढरीये ॥१॥
तें आम्ही देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणी डोळियांची ॥ध्रु॥
जीवांचे जीवन सुखाचे शेजार। उभे कटीं कर ठेवूनियां ॥३॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपर दुष्टां काळ ॥४॥
सुरवरां चिंतनी मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥५॥
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीतीं गातां ॥६॥
९७२.माझे मनोरथ पावले जैं सिद्धि । तई पायीं बुद्धि स्थिरावली ॥१॥
समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरणें हें ॥ध्रु॥
त्रिविध तापांचें झालेंसे दहन । सुखावले मन प्रेमसुखें ॥३॥
महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगी संग अखंडित ॥४॥
जीवनाचा झाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरी मावळलें ॥५॥
तुका म्हणे माप भरूं आलें शिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥६।।

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ६०. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top